Monday, January 19, 2015

चिनी फटाके नकोच नको



दिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण हे फटाके आता चीनी बनावटीचेच असतात आणि स्वस्त म्हणून त्याला मागणीही असते. पण आता आपल्याला भारतीय म्हणून विचार करायची वेळ येवून ठेपलेली आहे. चीन हा आता भारताचा सगळ्याच क्षेत्रातला प्रतीस्पर्धी आहे आणि सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली या सतत त्रासदायक होवून बसल्या आहेत. लडाखसारखा प्रांत असो की अरूणाचल प्रदेश मधले रस्ते बांधकाम, चीन सदोदीत भारताची अडवणूक करीत आला आहे.

अरूणाचल प्रदेशच्या सिमेवरच्या भागात चीनच्या बाजूने प्रशस्त सहा पदरी रस्ते, विमानतळ असं बांधकाम झालं असताना भारताने मात्र आपल्या सीमेत रस्त्यांचं बांधकाम करूच नये असंच चीनला वाटत आलं आहे. ही दादागिरी भारत सरकार आपल्या पातळीवर मोडून काढेलच पण एक भारतीय नागरीक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आजच्या जगात व्यापार हे सुद्धा एक अस्त्र आहे. आणि ते सगळ्यानाच पुरून उरतं. आज भारताच्या सगळ्या बाजारपेठा चीनी मालाने तुडुंब भरल्या आहेत. कपडे, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक उपकरणं इतकचं काय गणपतीच्या मुर्ती, आकाश कंदील, विजेचे दिवे, फळ फळावळ हे सगळंच चीनी होत चाललय. दिवाळीचा चीनी फराळ आला तर नवल वाटायला नको.  
 
सीमेवरच्या शत्रूला परत जा म्हणून सांगताना आता सैनिकांबरोबरच नागरीकही आपली भुमिका बजावू शकतात. चीनी मालाला नकार देवून आपण ती बजावली पाहीजे. फटाक्यांसारख्या आवाज आणि हवेचं  प्रदुषण करणार्‍य़ा वस्तू तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.  चिनी फटाके तर नकोच नको.     


 नरेंद्र प्रभू

विलेपारले, मुंबई. 

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...