Showing posts with label क्रांतिकारक. Show all posts
Showing posts with label क्रांतिकारक. Show all posts

Thursday, January 29, 2015

तवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक

तेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लागतं. काळ थांबत नाही तसे आपणही नकळत पुढे होत असतो. आता तर आम्हाला तवांगच्या दिशेने जायचं होतं. माझ्या स्मृतीत तर तवांगने पक्क घर केलं होतच. मी गेल्या वेळच्या खुणा शोधत असतानाच आमची गाडी भालुकपॉंगच्या दिशेने पळायला लागली, मात्र थोड्याच वेळात ड्रायव्हरला वेग आवरता घ्यावा लागला. तेजपूर शहराच्या बाहेर पडताच भालुकपॉंगच्या दिशेने रस्ता असा नव्हताच. धुळीचे लोट उठवत गाड्या पुढे जात होत्या. असम मधलं रस्ते उंचीकरणाचं काम राज्यव्यापी होतं तर. संथ गतीने मार्गक्रमण करीत आम्ही भालुकपॉंगला पोहोचलो पण वाटेत लागणार्‍या नामेरी नॉशनल पार्कचा आनंद म्हणावा तसा लूटता आला नाही. आसम अरुणाचल प्रदेश सिमेवर प्रवेश प्रक्रिया पुर्णकरून भालुकपॉंगला पोहोचलो तेव्हा रस्त्यातली धुळ जरा कमी झाली तरी पुढे रस्ते कमी अधिक प्रमाणात खराबच होते. एकूण ३१५ कि.मी. अंरत दोन दिवसात पार करायचं होतं.

पहिल्या टप्प्यातला धुळीचा पडदा दूर झाला, पुढे टिपीचं ऑर्केडीयम आलं. फेब्रूवारी महिना हा काही ऑर्किडचा फुलायचा काळ नव्हता. पाच-दहा मिनीटातच काढतापाय घेतला. तीन साडेतीन वाजताच ढगांचं साम्राज्य पसरल्याने सुर्य दर्शन होत नव्हतं. गर्द वनराईने नटलेले पर्वत धुक्याची शाल पाघरून असतानाच प्रकाश अंधूक होत गेला. बोमडीलाला हॉटेलवर पोहोचता पोहोचता पुर्ण काळोख झाला होता.

बोमडीला....., ही चीन-भारत युद्धाची रणभुमी. त्या दुखर्‍या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या कारण आम्ही त्या युद्धभुमी वरून प्रवास करत होतो. (जिज्ञासूंनी ब्रिगेडियर जॉन दळवी यांचं हिमालयन ब्लंडरहे पुस्तक वाचावं किंवा जयंत कुलकर्णी यांनी केलेलं भाषांतर तरी वाचावं.) संरक्षण सिद्धता या बाबतीत आपण आनादी काळापासून लंगडे आहोत. चाणाक्याच्या काळापासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक विरांनी आक्रमणं रोखून धरली पण पुन्हा पुन्हा आपण त्याच त्याच चुका करत आलोय. आता सुद्धा सरकार आणि सेना प्रमुखामध्येच जुंपलीय, असो.

काल सुर्य लवकर बुडाला तरी आज त्याने अपेक्षेपेक्षा आधीच दर्शन दिलं. अरुणाचल प्रदेश मधल्या पच्शिम केमांग जिल्ह्याचं बोमडीला हे मुख्यालय. हॉटेलच्या खिडकीतूनच बाहेरचा नजारा दिसत होता. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं ते सुंदर गाव आणि दुरवर दिसणार्‍या बर्फाच्छादीत पर्वत रांगा. या पर्वत रांगा पार करूनच आम्हाला तवांगला जायचं होतं. वाटेत लागणार्‍या बोमडीला मॉनेस्ट्री पासून पुन्हा प्रवासाला सुरुवत झाली. मॉनेस्ट्रीमध्ये चार दिवस चालणारा उत्सव चालू होता. एरवी शांत असणार्‍या मॉनेस्ट्रीत मंत्रोच्चार ऎकायला मिळाले. दिरांगला गरम पाण्याची कुंड पाहायच्या निमीत्ताने जरा पाय मोकळे केले. आजूबाजूचा निसर्ग मन मोहवत होता.   

नुकमॉडॉंग (Nyukmadong) येथील युद्ध स्मारकाची भेट मन हेलावणारी होती. बासष्ठ सालच्या युद्धात शौर्य गाजवणार्‍या योध्यांची नाव असलेले फलक वाचत असतानाच सौ. दांडेकरनी देशभक्तीपर गीत म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वांनीच  त्यांच्या सुरात सुर मिसळले. हिमालयाच्या पार्श्वभुमीवर तिरंगा डौंलाने फडकत होता.

१३,७०० फुटांवर असलेला से ला पास जवळ येत होता, हवेतला गारवा कमालीचा वाढला होता, बाहेर बर्फवृष्टी होत होती. या सहलीतली ती पहिलीच बर्फ़वृष्टी होती. चला हे  पण अनुभवायला मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुचीपर्णी वृक्षांवर बर्फ जमा झालं होतं. सेला पासला गाड्या थांबल्या. पासच्या कमानीचे फोटो घेण्यात काहीजण दंग होते तर काहींनी चहा आणि शेकोटीचा आधार घेतला होता. गरम गरम चहा पोटात गेल्यावर जरा हायसं वाटलं. पुन्हा तवांगच्या देशेने वाटचाल सुरू झाली. घड्याळात पाच वाजायला अजून थोडा अवकाश होता पण बाहेर काळोख दाटून आला होता........

                            

Wednesday, January 21, 2015

अंगामी योध्ये

आसाम-मणिपुरमध्ये चहाच्या बागांमधल्या उत्पादनाकडे तत्कालीन ब्रिटीश सरकारचं लक्ष गेलं तेव्हा त्यानी तो भाग आपल्या अधिपत्याखाली घेण्याचं ठरवलं. सुनियोजित आराखडा आणि सैनिकी बळ यांचा वापर करून तो भाग आपल्या अधिकारात येईल आणि स्थानिक जनतेला चहाच्या मळ्यात कामगार म्हणून राबवता येईल हा ब्रिटीशांचा मानस मात्र इथे सहज यशस्वी झाला नाही. या सर्वाला कारण होते ते तिथले नागा योध्ये. वृत्तीने अत्यंत साधे असले तरी आपल्यावर परकी शासक अंमल करणार ही गोष्टच त्यांना मान्य नव्हती. ब्रिटीशांना मात्र हा भाग येणकेणप्रकारेण पादाक्रांत करायचाच होता.

आसाममधल्या गुवाहाटीपासून 340 कि.मी. अंतरावर असलेल्या अंगामीला जायला तेव्हा रस्ता नव्हता. एकदा का रस्ता तयार झाला म्हणजे या भागावर अधिपत्य गाजवता येईल हे ब्रिटीशाना माहित होतं. 1832 साली शेकडो शिपाई बरोबर घेवून जेव्हा ब्रिटीश अधिकारी मणिपूरला जायला निघाले तेव्हा तिथल्या प्रत्येक नागा खेड्यात त्यांना कमालीच्या आणि चिवट संघर्षाला तोंड द्यावं लागलं. पहिला प्रयत्न व्यर्थ गेल्यावर मणिपुरचे राजे गंभिर सिंह यांच्या मदतीने ब्रिटीशानी पुन्हा एकदा वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. बरीच ताकद खर्च केल्यावर पोलिसचौकी स्थापित करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले. परंतू काही महिन्यातच मिझोमा आणि खोनोमा जमातींनी त्या चौक्या जाळून टाकल्या. 1950 पर्यंत ब्रिटीशांनी अशा दहा मोहिमा राबवल्या. 1850 च्या हिवाळ्यात ब्रिटीशांनी पुन्हा एकदा पाचशे शिपायांसह नागा टेकड्यांवर हल्ला केला त्या वेळीही सोळा तास तीव्र संघर्ष करीत नागा विरांनी ब्रिटीशांना रोखून धरलं पण एका बाजूला बंदुका आणि दुसर्‍या बाजूला बाण आणि भाले यांच्या विषम लढाईत नागांना गाव सोडून माघार घ्यावी लागली. ब्रिटीशांनी मोकळ्या झालेल्या गांवामध्ये प्रवेश करून नागां लोकांच्या वस्त्या जाळून टाकल्या. मणिपुरच्या खिक्रूमा गावापर्यंत हा संघर्ष जेव्हा पोहोचला तेव्हा तिथल्या रहिवाशांनी जोरदार विरोध केला आणि सुमारे शंभरच्यावर गावकरी कामी आले. कोहीमापर्यंत हा सिलसिला सुरू होता. शेकडो नागा योध्ये कामी आले आणि ब्रिटीशांवरचे हल्ले सुरूच राहिले. शेवटी गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने ही मोहीम थांबवण्याचं ठरवलं आणि तिथल्या पोलिस चौक्यांमधून शिपायी माघारी बोलावले.

स्थानिक नागा ज्या लोकांना ‘कंपनी मॅन’ म्हणून ओळखत त्या ब्रिटीशांना त्यानी आपल्या भूमीवर थारा दिला नाही. 1879 पुन्हा एकदा ब्रिटीशानी दिमंत या राजकीय अधिकार्‍याला सैनिकी सौरक्षणात नागा भूमीवर पाठवलं. अंगामी योध्यांनी त्या अधिकार्‍य़ा बरोबरच त्याच्या सोबत असलेल्या 39 सैनिकांना कंठस्नान घातलं आणि बाकिचे सैनिक जंगलात पळून गेले. पण याच सुमारास तिथे ख्रिश्चन मिशनर्‍यांनी यायला सुरूवात केली होती. नागा लोकांपैकी काहींना त्यांनी आपल्या धर्माची दिक्षा दिली होती तेच लोक मग ब्रिटीशांना हेरगिरीसाठी वापरता आले. असं असलं तरी शूर नागा लोकांनी संघर्ष सुरू ठेवला ब्रिटीशांनी पुन्हा माघार घेतली.

1880 मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फौजफाट्यासह ब्रिगेडीयर जनरल जे.एल. नॅशनच्या नेतृत्वाखाली मणिपुरवर हल्ला केला गेला. नागा जनतेने दर्‍याखोर्‍यांचा आसरा घेवून गनिमी युद्ध चालू ठेवलं. ब्रिटीश सैनिकांनी कोहीमा गावाला आग लावून ते भस्मसात केलं. पण नागांचा संघर्ष चालूच होता. त्यानी ब्रिटीशांच्या ताब्यातील चहाच्या मळ्यांवर हल्ला चढवला आणि सोळा कामगारांसह मॅनेजरला ठार केलं. पण परतीच्या रस्त्यावर नॅशनने त्यांची कोंडी केली आणि अन्न पाण्याविना नागा लढवैयाना प्राण गमावण्याची पाळी आली. शेवटी नागांनी शस्त्र खाली ठेवली. नागांना जबर दंड ठोठावण्यात आला. सर्व शस्त्रात्रं काढून घेण्यात आली. त्याची शेतं आणि गावं जप्त करण्यात आली तसंच चहामळ्यांवर गुलाम म्हणून नेण्यात आलं. ब्रिटीशांनी विजय महोत्सव साजरा केला आणि गव्हर्नरला सगळा वृतांत तारेने कळवण्यात आला.

एवढ्या सगळ्या मोहिमानंतरही नागांचा संघर्ष सुरूच राहिला. आपल्या शेतात, दर्‍याखोर्‍यात वास्तव्य करून ते ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडत होते. या वेळी मात्र मिशनरी ब्रिटीशांना सहाय्यकारी झाले. हळूहळू बदल होत होता. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ‘आझाद हिंद सेना’ कोहिमाला पोहोचली तेव्हा याच नागावीरांनी त्यांना मदत केली, नेताजींच्या आझाद हिंद सेनेने तिथे ब्रिटीशांचा पराभव केला. 

हेच नागा धर्मांतरानंतर मात्र बदलले. स्वातत्र्यानंतर तिथे आपल्याच देशाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. आपल्या स्वातंत्र्याचं प्राणपणाने रक्षण करणारे आणि ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडणारे  नागा आता मात्र आपल्याच नागरीकांचे आणि जवानांचे शत्रू झाले आहेत, हत्या करीत आहेत.     

                                                                     
Related Posts Plugin for WordPress, Blogger...