Thursday, January 29, 2015

तवांग (Tawang) अरूणाचल प्रदेश - भाग एक

तेजपूरच्या चित्रलेखा बागेच्या प्रसन्न वातावरणातून पाय काढवत नव्हता, पण एखादं ठिकाण कितीही आवडलं तरी आपणाला केव्हाना केव्हा पुढे जावंच लागतं. काळ थांबत नाही तसे आपणही नकळत पुढे होत असतो. आता तर आम्हाला तवांगच्या दिशेने जायचं होतं. माझ्या स्मृतीत तर तवांगने पक्क घर केलं होतच. मी गेल्या वेळच्या खुणा शोधत असतानाच आमची गाडी भालुकपॉंगच्या दिशेने पळायला लागली, मात्र थोड्याच वेळात ड्रायव्हरला वेग आवरता घ्यावा लागला. तेजपूर शहराच्या बाहेर पडताच भालुकपॉंगच्या दिशेने रस्ता असा नव्हताच. धुळीचे लोट उठवत गाड्या पुढे जात होत्या. असम मधलं रस्ते उंचीकरणाचं काम राज्यव्यापी होतं तर. संथ गतीने मार्गक्रमण करीत आम्ही भालुकपॉंगला पोहोचलो पण वाटेत लागणार्‍या नामेरी नॉशनल पार्कचा आनंद म्हणावा तसा लूटता आला नाही. आसम अरुणाचल प्रदेश सिमेवर प्रवेश प्रक्रिया पुर्णकरून भालुकपॉंगला पोहोचलो तेव्हा रस्त्यातली धुळ जरा कमी झाली तरी पुढे रस्ते कमी अधिक प्रमाणात खराबच होते. एकूण ३१५ कि.मी. अंरत दोन दिवसात पार करायचं होतं.

पहिल्या टप्प्यातला धुळीचा पडदा दूर झाला, पुढे टिपीचं ऑर्केडीयम आलं. फेब्रूवारी महिना हा काही ऑर्किडचा फुलायचा काळ नव्हता. पाच-दहा मिनीटातच काढतापाय घेतला. तीन साडेतीन वाजताच ढगांचं साम्राज्य पसरल्याने सुर्य दर्शन होत नव्हतं. गर्द वनराईने नटलेले पर्वत धुक्याची शाल पाघरून असतानाच प्रकाश अंधूक होत गेला. बोमडीलाला हॉटेलवर पोहोचता पोहोचता पुर्ण काळोख झाला होता.

बोमडीला....., ही चीन-भारत युद्धाची रणभुमी. त्या दुखर्‍या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या कारण आम्ही त्या युद्धभुमी वरून प्रवास करत होतो. (जिज्ञासूंनी ब्रिगेडियर जॉन दळवी यांचं हिमालयन ब्लंडरहे पुस्तक वाचावं किंवा जयंत कुलकर्णी यांनी केलेलं भाषांतर तरी वाचावं.) संरक्षण सिद्धता या बाबतीत आपण आनादी काळापासून लंगडे आहोत. चाणाक्याच्या काळापासून शिवाजी महाराजांपर्यंत अनेक विरांनी आक्रमणं रोखून धरली पण पुन्हा पुन्हा आपण त्याच त्याच चुका करत आलोय. आता सुद्धा सरकार आणि सेना प्रमुखामध्येच जुंपलीय, असो.

काल सुर्य लवकर बुडाला तरी आज त्याने अपेक्षेपेक्षा आधीच दर्शन दिलं. अरुणाचल प्रदेश मधल्या पच्शिम केमांग जिल्ह्याचं बोमडीला हे मुख्यालय. हॉटेलच्या खिडकीतूनच बाहेरचा नजारा दिसत होता. हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये वसलेलं ते सुंदर गाव आणि दुरवर दिसणार्‍या बर्फाच्छादीत पर्वत रांगा. या पर्वत रांगा पार करूनच आम्हाला तवांगला जायचं होतं. वाटेत लागणार्‍या बोमडीला मॉनेस्ट्री पासून पुन्हा प्रवासाला सुरुवत झाली. मॉनेस्ट्रीमध्ये चार दिवस चालणारा उत्सव चालू होता. एरवी शांत असणार्‍या मॉनेस्ट्रीत मंत्रोच्चार ऎकायला मिळाले. दिरांगला गरम पाण्याची कुंड पाहायच्या निमीत्ताने जरा पाय मोकळे केले. आजूबाजूचा निसर्ग मन मोहवत होता.   

नुकमॉडॉंग (Nyukmadong) येथील युद्ध स्मारकाची भेट मन हेलावणारी होती. बासष्ठ सालच्या युद्धात शौर्य गाजवणार्‍या योध्यांची नाव असलेले फलक वाचत असतानाच सौ. दांडेकरनी देशभक्तीपर गीत म्हणण्याची इच्छा व्यक्त केली आणि सर्वांनीच  त्यांच्या सुरात सुर मिसळले. हिमालयाच्या पार्श्वभुमीवर तिरंगा डौंलाने फडकत होता.

१३,७०० फुटांवर असलेला से ला पास जवळ येत होता, हवेतला गारवा कमालीचा वाढला होता, बाहेर बर्फवृष्टी होत होती. या सहलीतली ती पहिलीच बर्फ़वृष्टी होती. चला हे  पण अनुभवायला मिळालं. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या सुचीपर्णी वृक्षांवर बर्फ जमा झालं होतं. सेला पासला गाड्या थांबल्या. पासच्या कमानीचे फोटो घेण्यात काहीजण दंग होते तर काहींनी चहा आणि शेकोटीचा आधार घेतला होता. गरम गरम चहा पोटात गेल्यावर जरा हायसं वाटलं. पुन्हा तवांगच्या देशेने वाटचाल सुरू झाली. घड्याळात पाच वाजायला अजून थोडा अवकाश होता पण बाहेर काळोख दाटून आला होता........

                            

Tuesday, January 27, 2015

जंगल संपत्तीचा विनाश


विकासाच्या नावाखाली भकास होत जाणारी वनसंपदा ही अवघ्या जगाचीच समस्य होवू घातली आहे.  एकेकाळी आपला पश्चिम घाट हा इथल्या जैव विविधतेसाठी प्रख्यात होता, आजही आहे पण विकासाच्या नावाखाली त्याच्या नरडीला नख लावायला इथले राजकर्तेच पुढे सरसावले आहेत. तिकडे अमेरिकेत कॅलिफोर्नियात समुद्र किनाऱ्यालगत,  प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेल्या आणि खूप उंच वाढणाऱ्या 'रेडवूड' या वृक्षाचं जंगल आहे. विशेष म्हणजे जगात हा वृक्ष इतरत्र कोठेही आढळत नाही. फर्निचरच्या व्यवसायासाठी अमेरिकन लाकूड कंपन्या या वृक्षाची सर्रास तोड करतात. जंगल संपत्तीचा विनाश हा किती घातक ठरू शकतो याचा धडा उत्तराखंडाने दिल्याला अजून वर्षही झालेलं नाही.

हिमालयाच्या कुशीत वसलेलं देवभूमी उत्तराखंड निसर्ग सौदर्याने ओसंडून वाहात होतं. या राज्यात काय नाही ते विचारा. गंगा, यमुना, भागीरथी, अलकनंदा, मंदाकिनी, धवलगंगा, पुष्पावती, भिलंगणा, सोंगनदी सारख्या नद्या, नैनिताल, मसुरी, रानीखेत अशासारखी तीन डझन थंड हवेची ठिकाणं, बिनसर, जिम कॉर्बेटसह चार अभयारंण्य. आणि या निसर्गसंपदे बरोबरच बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हरिव्दार, हृषीकेश, गौरीकुंड, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, हेमकुंड साहेब, जोशीमठ, कर्णप्रयाग, देवप्रयाग अशी हजारो वर्षाची धार्मिक परंपरा लाभलेली तिर्थक्षेत्रं. या सर्व संपदेवर माणसाची वाईट नजर पडली आणि त्याच्या स्वार्थानेच या प्रदेशाचा घात केला. लोभापायी नद्या, पहाड, जंगलाचा ताबा घेतला गेला. हे सर्व करताना १९९८ साली रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठची भूस्खालनाची घटना आणि तिने झालेली जीवित तसंच वित्तहानी दुर्लक्षीली गेली. अलकनंदा नदीला चार दशकापुर्वी आलेल्या महापुराचा सर्वांनाच विसर पडला. ते रौद्रतांडव विसरल्यामुळेच  आणि पर्यावरण तज्ज्ञांकडून वारंवार देण्यात येणारा धोक्याचा इशारा नजरे आड केला गेल्यानेच  त्याहून मोठा प्रलय गेल्याच वर्षी पाहावा लागला.

वनसंपदेचा मानवाला असलेला फायदा किंबहूना त्या वनसंपदेवरच टिकून असलेला माणूस आज त्या त्या वनांचाच वैरी झाला आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया असो की आपला पश्चिम घाट संपत्तीच्या हव्यासापायी ही वन क्षेत्रं आक्रसत चाललीत पण तिकडे दूर पुर्वोत्तर राज्यांमध्येही हिरव्यागार वनराजींनी व्यापलेलं हजारो एकर जंगल वणव्यांच्या भक्षस्थानी पडत आहे. या आगी मुद्दामहून लावल्या जात आहेत हे विशेष. फिरत्या शेतीच्या (jhum cultivation) अघोरी हव्यासामुळे इथली जंगलं अगदी दर वर्षी आगीच्या भक्षस्थानी पडतात आणि हिमालयाच्या पर्वतराजींमधली ही अमुल्य जंगलं नष्ट तर होतातच पण तिथले डोंगर उघडे बोडके होवून आपणच विनाशाच्या सीमारेषेवर येवून उभे राहतो हे तिथल्या जनतेच्या लक्षातही येत नाही. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात या भागात फेरफटका मारल्यास पर्वतच्या पर्वत जळत असतात आणि आसमंतात धुराचे लोटच्या लोट उठत असतात. अरुणाचल प्रदेश आणि मणीपूर मध्ये हे दृष्य या महिन्यात नेहमीच पाहायला मिळतं. भारत सरकारच्या वन सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहाणीत जे तथ्य समोर आलं आहे ते खरंच थरकाप उडवणारं आहे. या सर्वेक्षणानुसार दरवर्षी 2100 चौरस किलोमीटर जंगल जाळण्यात येतं.  नेमकी आकडेवारी पाहायची झाली तर 2009 साली 1000 चौ.कि.मी., 2010 साली 2118 चौ.कि.मी., 2011 साली 1119 चौ.कि.मी., एवढा संपन्न जंगलांचा भाग आगीच्या भक्षस्थानी पडला आणि त्या जमिनीवर स्थलांतरीत किंवा फिरती शेती केली गेली. शेकडो वर्षांच्या कालखंडात उभी राहिलेली जंगलं नष्ट झाली आणि त्याखालची हजारो वर्षापासून संरक्षीत असलेली उपजावू जमीन धुतली गेली. या जळीतकांडामुळे उघडी पडलेली जमीन हे उद्या येवू घातलेल्या संकटाची नोटीसच आहे.

आपल्या भारत देशातला पुरवांचलाचा प्रदेश म्हणजे हिमालयाच्या अंगाखांद्यावरचा आणि म्हणूनच निसर्गसंपदेचं वरदान लाभलेला भाग आहे. वनसंपदे मुळे त्या खालच्या जमीनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, जर वरची जंगलंच नष्ट झाली तर मात्र त्या उघड्या बोडक्या जमीनीची धुप तर होईलच पण पाणी साठवण्याची क्षमता नष्ट होवून तो सगळा टापूच वैराण होवून जाईल. ब्रम्हपूत्रा, जीया बोरोली, शोणीत अशा अनेक नद्या याच भागात वाहात असून इथल्या जनतेला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवू देत नाहीत. पण या नद्यांच्या आजूबाजूची जंगलं नाहीशी नष्ट तर मात्र या नद्यांचं पाणी आटून जाईल. पुर्वांचलाची शुभ्र बर्फाच्छादीत शिखरं, प्रसन्न मोकळी आल्हादायक हवा, हिरवागार परिसर आणि खळाळत्या नद्या या सर्वांमुळे हा भाग तिथे गेलेल्या प्रत्येकालाच भुरळ घालतो. अशा ठिकाणची जंगलं जर नाहीशी झाली तर उत्तरंचलात अलिकडेच झाली तशी ढगफूटी झाली तर काही काळायच्या आतच होत्याचं नव्हतं होईल आणि सगळीकडे हाहाकार माजेल. नंतर निसर्गाला दोष देण्यात काहीच अर्थ उरणार नाही. अशी आपत्ती आल्यावर नेहमीच निसर्गाच्या नावाने बोटं मोडली जातात. पण या सगळ्या आपत्तीची तयारी आपणच करून ठेवतो. वर दिलेली आकडेवारी या तयारीचीच जाणीव करून देत आहेत. पुर्वांचलात काहीही दुर्घटना घडली की त्याचा दोष चीनच्या माथी मारण्याची आपल्याला सवयच झाली आहे. ते काही अंशी खरं असलं तरी आपल्याच हाताने आपण लावलेल्या या आगीना आपणच जबाददार आहोत. चीन कितीही नीच असला तरी त्याला या बाबतीत तरी दोष देता येणार नाही.

काही वेळा नैसर्गिक वाटणार्‍या आपत्ती या मानव निर्मितच असतात. फक्त माणसाने हळूहळू त्या आपत्तीची तयारी केकेली असते आणि निसर्ग एकच घाव घालून ती खुली करून टाकतो. जगातली सर्वात तरूण आणि पृथ्वीच्या उत्पती नंतर सर्वात शेवटी तयार झालेला ठिसूळ प्रदेश म्हणजे हिमालय. जोराच्या वार्‍यानेही या जमीनीची सतत धुप होत असते. तिव्र डोंगर उतारावरून वाहत येणारे प्रवाह तर ही माती घेवून पठारी प्रदेशाकडे सतत धाव घेत असतात. याला अडवायचं कुणी? निसर्गानेच याचं उत्तर शोधलं आणि वनराई आणि वृक्षांच्या मदतीने ही धुप थांबवली. जमीन थोडी स्थिर झाली. या झाड झाडोर्‍याच्या मदतीने तिथल्या कष्टाळू भुमीपुत्रांनी आपलं जीवन सुखकर नसलं तरी सुसह्य बनवलं आहे. तिथली जनाता निसर्गाच्या कलाने घेत आपलं जीवन जगत आहे तो पर्यत निसर्गही त्याला साथ देणार पण हा निसर्गाचा आधार आपल्या हातानेच आपण काढून घेतला तर मात्र मग इथे हात द्यायला कुणीच उरणार नाही. 

आगीचे वणवे पेटले की तिथली निसर्ग संपदा नष्ट होते. ही निसर्ग संपदा म्हणजे केवळ झाडंच नसतात तर त्यांच्या आश्रयाने रहाणारे हजारे प्राणी, पक्षी, जीव-जीवाणू, सरपटणारे प्राणी, किटक, मुंग्या, अनेक सुक्ष्म प्राणी या सर्वांचीच आहूती दिली जाते आणि त्यांचा आधीवासच नष्ट केला जातो. किती तरी जाती कायमच्या नाहीशा होतात. हे नुकसान तर पुन्हा कधीही भरून येणार नसतं.   उत्तराखंडाचे तांडव आता हिमालयातील सर्व राज्यांसाठी धोक्याची घंटा ठरली आहे. गंगेसारखे रौद्र रुप जर ब्रम्हपुत्रेनं घेतलं तर तिथल्या अनेक राज्यात उत्पात घडू शकतो. विनाशाच्या या इशार्‍यांनी आपण जागे होणार आहोत का हा खरा प्रश्न आहे. भारतात दरवर्षी दहा लाख हेक्टर जंगल नष्ट होत आहे असा अभ्यासकांचा अंदाज आहे. आपल्या पश्चिम घाटाचीही अशीच घुसमट होत आहे. सह्याद्रीच्या कुशीत चंगळनगर्‍या उभ्या राहात आहेत. जैवविविधतेचं जागतिक वारसास्थळम्हणून घोषीत झालेल्या याच सह्याद्रीच्या संदेदनशील भागाचं संरक्षण, संवर्धन करण्यासाठी सुचवलेल्या उपायांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष करून त्याला विरोधही करण्यात येत आहे. पश्चिम घाटाच्या दर्‍या-डोंगरामधून रस्त्यांची, शहरीकरणाच्या प्रकल्पाची कामं होवू घातली आहेत. कोकणातल्या स्थानिक जनतेचा विरोध डावलून धनदांडग्यांचं हित जपलं जात आहे. माथेरानचा ४९८ चौरस कि.मी.चा टापू २००२ च्या फेब्रुवारीत पर्यावरण संवेदनशीलम्हणून घोषीत केला गेला आणि २००३ मध्ये  मात्र ते क्षेत्र २१५ चौरस कि.मी.वर आणलं गेलं. महाराष्ट्रातल्या सर्वच नद्यांच्या पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून बारमाही वाहणार्‍या कित्येक नद्या आता पावसाळ्यातच तग धरून असतात आणि पाऊस निघून गेल्यावर कोरडया पडतात. नदी पात्रात सोडण्यात येणार्‍या रासायनीक द्रव्य आणि मळीमुळेही इथला आधीवास धोक्यात आला आहे. अवैध खाणींच्या मुद्द्यावरून गोव्यातील खाणी गेली दोन वर्ष बंद आहेत. पण त्या  आधीच केलेल्या अनिर्बंध खोदकामामुळे तिथल्या निसर्गाची पर्यायने जनसामान्यांच्या सपत्तीची फार मोठी हानी झाली आहे. जैवविविधतेच्या आणि अन्नसाखळीच्या वरच्या  स्थानावर असलेल्या वाघांच्या संखेत वेगाने होणार्‍या गळतीमुळे ती साखळीच धोक्यात येणार आहे. या सर्वाचे तिव्र आघात इथल्या जैवविविधता,  हवामान,  पूरस्थिती,  लोकांची उपजीविका, सुरक्षितता यावर होत असतो याचं भान वेळीच ठेवलं गेलं नाही तर हिमालयातली सुनामी सह्याद्रीत यायला वेळ लागणार नाही. पर्यावरण संवर्धन आणि जतन ही आता लोक चळवळ झाली पाहिजे.  


आगीच्या वणव्यात जळणारी ही जंगलं हवामान बदलालाही आमंत्रण देत आहेत. नुकताच अर्धा अधिक महाराष्ट्र गारपीटीने चेचून निघाला. उभी शेतं भूईसपाट झाली, हजारे उडते पक्षी प्राण गमावून बसले, तीच हालत उघड्यावरच्या जनावरांचीही झाली. त्या आस्मानी मार्‍यापासून माणूसही सुटला नाही. नुकतंच जरा थांबलेलं आत्महत्येचं सत्र पुन्हा सुरू झालं. विनाशाला आपण थांबवू शकत नसलो तरी त्याला निमंत्रण तरी देता कामा नये. नैसर्गिक संकट आलं की मग मागे वळूनही पाहाता येत नाही. 

Saturday, January 24, 2015

लोटे परशुराम ते परशुराम कुंड

परशुरामाने जोडलेला दुवा

त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात  हिंदुस्थानभर संचार केल्याच्या खुणा सापडतात. आपल्या असामान्य पराक्रमाच्या जोरावर त्यानी दुष्ट आणि नराधम राज्यांचा निप्पात केला आणि धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी जिवाचं रान केलं.

परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण प्रांताची निर्मिती केली असं म्हटलं जातं. भारतात समुद्रालगतच्या अनेक ठिकाणी हिच कथा सांगितली जाते. कोकण प्रांताला तर परशुराम भूमी म्हणूनच ओळखलं जातं. तिकडे देशाच्या पुर्वोत्तर राज्यातही परशुरामाच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मातृ आणि पितृ भक्त परशुराम तर जगविख्यात आहे. पित्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून त्याने स्वत:च्या आईचंच शिर धडावेगळं केलं आणि पुन्हा पिता प्रसन्न होताच आईसाठी जीवन मागून घेतलं. आईच्या हत्तेचं हे पाप धुण्यासाठी त्याने ज्या कुंडात उडी टाकली त्या लोहीत नदी मधल्या कुंडाला परशुराम कुंड म्हणून ओळखलं जातं. त्या काळापासूनच दर संक्रातीला या कुंडात स्नान करण्यासाठी हजारो श्राद्धाळू एकत्र येत असतात.

या वर्षीच्या मकरसंक्रातीच्या पवित्रस्नाच्या वेळी पन्नास हजार भाविकांनी परशुराम कुंडाला भेट दिली. त्यापैकी तीस हजार यात्रेकरू भारताच्या विविध भागातून आले होते अशी माहिती लोहीत जिल्ह्याच्या वाक्रो प्रांताचे अतिरीक्त सहाय्यक आयुक्त श्री. दाक्तो रिबा यांनी दिली आहे. यात्रेकरूंची ही संख्या गतवर्षा पेक्षा कमी आहे असंही रीबा म्हणाले. यात्रेकरूंची ही घटती संख्या प्रशासनालाही अपेक्षीत नव्हती.

आपल्या अरुणाचल प्रदेश राज्यातला लोहीत जिल्हा निसर्गसंपदा आणि सौदर्याने भरलेला आहे. या जिल्ह्यातून वाहणार्‍या लोहीत नदीवरूनच या जिल्ह्याला लोहीत हे नाव दिलं गेलं आहे. अनेक पौराणिक आणि ऎतिहासिक कथांशी जोडल्यागेलेल्या या ठिकाणी पर्यटनाला खुपच वाव आहे. शहरी प्रदुषणाचा मागमुस नसलेला हा प्रांत बर्फाच्छादीत शिखरं, खळाळते जलप्रवाह, नद्या, सदाहरीत जंगलाने परीपुर्ण असून पर्यटकाना सदोदीत साद घालत आहे. इथली गावं देश विदेशातील पर्यटकांच आकर्षण ठरू शकतील एवढी देखणी आहेत आणि त्यानी आपली पारंपारीक नृत्य आणि कलांची जपणूकही केली आहे. पर्वतारोहण, राफ्टींग, जंगल सफारी आणि हत्तीवरून फेरफटका मारणं  अशा पर्यटनाच्या अनेक संधी असूनही त्या दृष्टीने हा भाग अजून दुर्लक्षीत राहीला आहे. परशुरामकुंड हे अरुणाचल मधील तिर्थस्थळ,  भालुकपॉंग, दिरांग, बोमदीला, से ला पास,  ही चिन-भारत युद्ध भूमी,   तळ्याचं तवांग या सर्वांचा इतिहास-भूगोलात असलेला उल्लेख एवढाच आपला असलेला संबंध असं न राहाता हिमालयाच्या कुशीत वसलेला अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा भाग असलेला कोकण प्रांत यांचं नातं परशुरामकुंड तसंच पर्यटनाच्या निमित्ताने घट्ट झालं तर विविधतेत असलेली एकात्मता या म्हणण्यालाही काही अर्थ प्राप्त होईल, नाही का?  




Friday, January 23, 2015

चोकलांगन – एक अस्पर्श गाव


तिथे जायला गाडी रस्ता आहे पण तो नावालाच. पस्तीस किलोमीटर गाडीरस्ता पार करायला तीन-साडेतीन तास लागतात.  जवळच्या नोकलॅक या शहरवजा खेड्याला जोडणारा हा रस्ता तयार झाला तोच मुळी 2010 साली. अगोदर हाच पल्ला पार करायला नवू दहा तास लागायचे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि ब्रम्हदेशाला (म्यानमार) लागून असलेलं हे गाव म्हणजे चोकलांगन. एका अर्थाने बाहेरच्या जगाचा वाराही न लागलेलं. आपलं आपल्यातच गुंतलेलं आणि गुंफलेलं एक स्वयंपुर्ण खेडं.
ब्रम्हदेशाच्या सीमेला लागून असलेल्या या खेड्यातील लोक आपल्या आपतेष्टांना भेटायला जातात ते डोंगरा पलिकडल्या गावात ब्रम्हदेशात. ब्रिटीशांनी भारत सोडताना नकाशावर मारलेल्या रेषांनी या गावकर्‍यांमध्ये अंतर पाडलं नाही. नागालँड राज्यातला तुएनसंग हा सिमावर्ती जिल्हा हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांचा बनलेला आहे, याच जिल्ह्यात हे गाव आहे. चोकलांगनसारख्या गावातील डोंगर उतारावर वस्ती करून असलेले गावकरी निसर्गाचा मान राखून, त्याला न दुखावता आपलं जीवनक्रमण करीत आहेत. आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सेवेचा मागमूसही नसलेल्या या ठिकाणी भारत आणि इंडीया या मधली दरी प्रकर्षाने जाणवत राहाते. आज या एकविसाव्या शतकात जग वाटचाल करीत असताना एकोणीसाव्या शतकातल्या राहाणीमानाशी साधर्म्य असलेलं हे गाव अजून आपल्याला किती भारत निर्माण करायचं राहून गेलं आहे याचा दाखला देतं. मोबाईल तर दूरची गोष्ट पण इथले विजेचे खांबही दिवसा उजेडीच प्रकाश बघतात आणि पुर्वांचलात लवकर होणार्‍य़ा सुर्यास्ताबरोबरच काळोखात गुडूप होतात. 2010 साली तयार करण्यात आलेला रस्ता आता नावालाच शिल्लक आहे. आपला शेजारी देश चिन भारताच्या सिमेलगत जगातले सर्वोत्तम रस्ते निर्माण करीत आहे आणि आपण तयार केलेले रस्ते दुसर्‍याच दिवशी फक्त कागदावरची रेष असतात आणि प्रत्यक्षात कालचा दिवस बरा होता म्हणण्याची पाळी स्थानिक जनतेवर येते.

तीनकशे घरटी असलेल्या चोकलांगन गावात 2640 गावकरी वसती करून आहेत असं तिथली व्यवस्ता सांगते. या एवढ्या लोकवस्तीला भारतात सर्वसाधारण गावात असलेली कुठलीच सेवा-सुविधा किंवा सोय सवलत आज तागायत मिळालेली नाही. सरकार दप्तरी या गावाला  1986 साली विज पुरवठा केल्याचा उल्लेख आढळला तरी 2002 साली पुन्हा एकदा हे गाव विजेच्या तारांनी जेडलं गेलं पण त्या तारांमधून अभावानेच विज प्रवाह खेळत असतो. हे आपल्यां कडून असं असलं तरी ब्रम्हदेशातल्या शेजारी तैगन गावामधून जीवाभावाचा अनोखा प्रवाह या गावापर्यंत सतत वहात असतो. खैमुनगन या एकाच जमातीतले हे लोक चोकलांगन आणि तैगन गावात वसती करून पिढ्यानपिढ्या रहात आहेत. दोन वेगवेगळ्या देशात राहूनही या लोकांमधला बंधूभाव तसूभरही कमी झालेला नाही.

एवढ्या समस्या असल्या तरी इथले लोक खुपच समाधानी आहेत. या गावात गेल्यास अगदी प्रत्येक घर अभ्यागताचं स्वागत करायला उत्सुक असतं. बांबुच्या झोपडीवजा घराशेजारी खेळ खेळणारी लहान मुलं दगड, बांबू, लाकूड अशाच गोष्टी हातात घेवून खेळत असतात. शाळेत शिकायच्या या वयात मात्र त्याना शिकायला शाळाच नाही. पण हे पट्ठे बांबू हातात धरायला शिकल्यानंतर त्याच बांबूपासून तर्‍हतर्‍हेच्या वस्तू बनवायला केव्हा शिकतात ते त्यांचं त्यानाच कळत नाही. इथला प्रत्येकजण परंपरागत बांबूकामात पारंगत आहे. वर्षभरात अल्पकाळ केली जाणारी डोंगर उतारावरची शेती सोडल्यास उरलेल्या वेळी बांबूकामात गुंतलेले इथले हात वयाच्या ऎशीव्या वर्षीही थकत नाहीत.

चोकलांगन हे खेडं जरी आधुनीक जगापासून आणि सोयी सुविधांपासून कोसो दूर असलं तरी याच आधुनीक जगाच्या शोषणा पासून इथला निसर्ग वाचला आहे. म्हणूनच इथली निसर्ग संपदा पाहाताना आपल्याला माणसाने अनिर्बंध वापर करायच्या आधीचं जग पाहिल्याच सुख नक्कीच मिळतं. म्हणूनच हे खर्‍य़ा अर्थाने न बिघडवलेलं जग पहाण्यासारखं आहे. या गावाकडे घेवून जाणारा रस्ता भले ओबडधोबड आहे पण तो ओलांडून गेल्यावर हिरव्यारंगात न्हालेल्या अनंत छटा, निळाईत आणि धुक्याच्या दुलईत धुसर होत जाणारे डोंगर कडे, झुळझुळत जाणारे झरे, बांबूची बेटं असं दिसणारं तिथलं दृष्य आपलं मन मोहून टाकेल यात शंकाच नाही.


या चोकलांगनबद्दल ऎकलं आणि मला माझ्या लहाणपणची कोचरा या गावातून परुळ्याला जाणारी डोंगरातली वाट आठवली. झाड-झाडोरा, तुफान वारा, इकडून तिकडे सतत हालचाल करणारे पक्षी, कधी चुकून दिसणारे पण मनाचा थरकाप उडवणारे बिबळा, रान डुक्कर किंवा रानरेड्यासारखे  हिंस्र प्राणी. दूरवर समुद्रात पसरलेला सिधुदुर्ग किल्ला. वर निळं आकाश आणि पायाखाली कधीही चुकूशील म्हणणारी पाऊलवाट. एक डोंगर चढावा आणि दुसर्‍या बाजूला उतरावं. सहा ऋतू आणि त्रिकाळ वेगवेगळ्या रुपात दर्शन देणारा निसर्ग. आधुनिकतेचं वारं नसलं तरी सतत कात टकत जाणारा हा सगळा परिसर मनाला मोहवून टाकत असे.  

Thursday, January 22, 2015

ईशान्य राज्यातील पर्यटन समज - गैरसमज


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर संसदेत भाषण करताना ईशान्य भारतात पर्यटन वाढले पाहिजे असा आग्रह धरला. भारतात असलेल्या तीस हजार महाविद्यालयातून दरवर्षी शंभर विद्यार्थी जरी पुर्वांचलाच्या सफरीवर गेले तरी तीथल्या पर्यटनात खुपच वाढ होईल आणि त्या रांज्यांमधील जनतेला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोलाची मदत अशा पर्यटनातून घडेल यावर पंतप्रधानांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. केंद्र सरकार पुर्वांचलाबबत किती संवेदनशील आहे आणि नव्या सरकारने ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी जो रोडम्याप तयार केला आहे त्याचं सुतोवाच पंतप्रधानांच्या भाषणात प्रतीबिंबीत होत होतं. अरुणाचल प्रदेश मधून निवडून आलेले श्री. किरेन रिजीजू हे गृहखात्याचे राज्य मंत्री आहेत तर आसामच्या लखीमपूरचं प्रतीनिधीत्व करणारे सर्बानंद सोनोवाल यांच्याकडे क्रिडा आणि युवक कल्याण खात्याच्या स्वतंत्र कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुर्वांचलातील या मंत्रांच्या रुपाने तिथल्या जनतेला आपला आवाज दिल्लीपर्यंत समर्थपणे पुहोचवता ये ईल. नव्या केंद्र सरकारमुळे संपुर्ण देशात आशादायक वातावरण निर्माण झालं असून ईशान्य राज्यातील जनताही त्याला अपवाद नाही.

असं असलं तरी ईशान्य राज्यातील पर्यटन हे तितके सोपे आहे का? अशी शंका अनेकजण व्यक्त करतात आणि त्याचं निराकरण होणं आवश्यक आहे. ईशान्य राज्यातील पर्यटन म्हटलं ही सगळ्यात पहिल्यांदा आठवत ते आसाममधलं काझिरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मेघालयातलं चेरापुंजी. गुवाहाटी, कामाख्या मंदीर, तेजपूर, शिलॉंग, तळ्यांच तवांग, माजूली बेट अशी अनेक ठिकाणं अभ्यासू पर्यटकांना साद घालू लागतात. अभ्यासू म्हटलं कारण पर्यटनाच्या असंख्य संधी असूनही गेल्या साठवर्षात या भागाकडे कुणीही जाणीवपुर्वक पाहिलं नाही. त्या मुळे सर्वसाधारण पर्यटक तिकडे फिरकलाच नाही.  सात राष्ट्रीय उद्यानं, एकशे आठ तळ्यांचा अद्भूत देखावा दाखवून डोळ्याचं पारणं फेडणारं ‘तळ्यांच तवांग’, पुर्वांचलाचं सांकृतीक केंद्र असलेलं माजूली बेट, छाया-प्रकाशाचा खेळ खेळत राहणारं मेघालय, ब्रम्हपूत्रेचं खोरं असलेलं आसाम, हिमालयाच्या पर्वत रांगांचा सुखद अनुभव देणारा भालूकपॉंग, दिरांग, बोमडीला हा प्रदेश, नागालॅन्डमध्ये दरवर्षी तिथल्या सतरा जनजातींचं निवासी गाव वसवून   महिनाभर साजरा होणारा हॉर्नबील फेस्टीवल ही ठळक आकर्षणं आणि याहूनही मनोवेधक अशी कितीतरी ठिकाणं या राज्यांमध्ये असून पर्यटकांसाठी हा भाग म्हणजे नंदनवनच आहे.                              

गेल्या दहा वर्षात आरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालॅन्ड मधलं पर्यटन वाढीस लागलं असून तिथली जनता आणि पर्यटन विभाग आपल्या स्वागताला तयारच असतात. उत्तम व्यवस्था असलेली रिसॉर्टस, हॉटेलं या बरोबरच सर्वप्रकारच्या खाण्याचा अस्वाद देणारी साखळी खानपान गृह हमरस्त्या शेजारी आढळून येतात. पर्यटकांना येजा करण्यासाठी वाहनं आणि रस्ते यांची बर्‍यापैकी असलेली उपलब्धता भारतातील कुठल्याही प्रदेशासारखीच असल्याने आपण फार दुर्गम भागात आलो आहोत असं वाटत नाही.

आपल्या देशात आंतरराष्टीय सिमेच्या लगत जायचं असेल तर पर्यटकांना ‘इनर लाइन परमिट’ घ्यावं लागतं. इनर लाइन परमिटची मुदत सात दिवस असते आणि नंतर आवश्यकता असेल तर ते वाढवून देण्यात येतं. (इनर लाइन परमिटसाठी एक फोटो आणि मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड सारखं ओळखपत्र सादर करावं लागतं.) त्या राज्याच्या निवासी आयुक्तांकडून अशी परमिट दिली जातात. आता बर्‍याच ठिकाणी या गोष्टीचं सुलभीकरण करण्यात आलं आहे किंवा त्यात बदल केला असून चेक नाक्यावर केवळ नोंदी करून पर्यटकांना त्या भागात प्रवेश दिला जात आहे. (जम्मू काश्मिर राज्यातल्या नुब्रा खोर्‍यासारख्या ठिकाणी जायचं असेल तर पुर्वी इनर लाइन परमिट घ्यावं लागत होतं. या वर्षीच्या मे महिन्यापासून ते स्थगीत करण्यात आलं आहे.)

पर्यटन संस्थेची मदत न घेता जाणार्‍या पर्यटकांना या भागात अजूनही अनेक समस्यांना तोंड द्यावं लागण्याची शक्यता असते. त्यातली मुख्य समस्या म्हणजे ‘इनर लाइन परमिट’ ही होय. अर्थात ईशान्येकडच्या राज्यात अरूणाचल प्रदेश मधल्या तवांग किंवा झायरो अशा ठिकाणी जायचं असेल तर ‘इनर लाइन परमिट’ घ्यावं लागतं. अन्यथा वर उल्लेख केलेल्या बहुतांश ठिकाणी त्याची आवश्यकता नाही. निवासी आयुक्तांच्या कार्यालयात जावून ‘इनर लाइन परमिट’ घेणं यात सहलीतला एक महत्वाचा दिवस खर्ची पडतो. हे टाळायचं असेल तर भुतान सारख्या देशात भारतीयांना रस्ते मार्गाने प्रवेश करण्यासाठी देण्यात येणार्‍या परमिट सारखी व्यवस्था करण्यात आपल्या देशातील प्रशासनाला कोणतीच अडचण यायला नको असं वाटतं. भुतान मध्ये प्रवेश करताना संगणकावर फोटो घेतला जातो आणि ओळख पत्राची (पारपत्र, मतदार ओळखपत्र इत्यादी पैकी एक) प्रत घेवून परमीट देण्यात येतं. हा वेळ ही वाचवता येवू शकतो. इंटरनेटच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पुर्ण करून इच्छूकांना घरबसल्या परमिट देण्याची प्रक्रिया पर्यटन विभागाने सूरू केल्यास या भागातील पर्यटनाला चालना तर मिळेलच शिवाय पर्यटकांचा अमुल्य वेळ ही वाचू शकेल.                          


इशान्येकडल्या आरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि नागालॅन्ड या राज्यात देशातील इतर राज्याप्रमाणे आपण विनाव्रत्यय प्रवास करू शकतो. मात्र मणीपूर, मिझोराम या राज्यात अजूनही अशांतता असल्याने तिथलं पर्यटन तितकसं सोपं नाही.     
    

Wednesday, January 21, 2015

अंगामी योध्ये

आसाम-मणिपुरमध्ये चहाच्या बागांमधल्या उत्पादनाकडे तत्कालीन ब्रिटीश सरकारचं लक्ष गेलं तेव्हा त्यानी तो भाग आपल्या अधिपत्याखाली घेण्याचं ठरवलं. सुनियोजित आराखडा आणि सैनिकी बळ यांचा वापर करून तो भाग आपल्या अधिकारात येईल आणि स्थानिक जनतेला चहाच्या मळ्यात कामगार म्हणून राबवता येईल हा ब्रिटीशांचा मानस मात्र इथे सहज यशस्वी झाला नाही. या सर्वाला कारण होते ते तिथले नागा योध्ये. वृत्तीने अत्यंत साधे असले तरी आपल्यावर परकी शासक अंमल करणार ही गोष्टच त्यांना मान्य नव्हती. ब्रिटीशांना मात्र हा भाग येणकेणप्रकारेण पादाक्रांत करायचाच होता.

आसाममधल्या गुवाहाटीपासून 340 कि.मी. अंतरावर असलेल्या अंगामीला जायला तेव्हा रस्ता नव्हता. एकदा का रस्ता तयार झाला म्हणजे या भागावर अधिपत्य गाजवता येईल हे ब्रिटीशाना माहित होतं. 1832 साली शेकडो शिपाई बरोबर घेवून जेव्हा ब्रिटीश अधिकारी मणिपूरला जायला निघाले तेव्हा तिथल्या प्रत्येक नागा खेड्यात त्यांना कमालीच्या आणि चिवट संघर्षाला तोंड द्यावं लागलं. पहिला प्रयत्न व्यर्थ गेल्यावर मणिपुरचे राजे गंभिर सिंह यांच्या मदतीने ब्रिटीशानी पुन्हा एकदा वर्चस्व स्थापित करण्याचे प्रयत्न केले. बरीच ताकद खर्च केल्यावर पोलिसचौकी स्थापित करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले. परंतू काही महिन्यातच मिझोमा आणि खोनोमा जमातींनी त्या चौक्या जाळून टाकल्या. 1950 पर्यंत ब्रिटीशांनी अशा दहा मोहिमा राबवल्या. 1850 च्या हिवाळ्यात ब्रिटीशांनी पुन्हा एकदा पाचशे शिपायांसह नागा टेकड्यांवर हल्ला केला त्या वेळीही सोळा तास तीव्र संघर्ष करीत नागा विरांनी ब्रिटीशांना रोखून धरलं पण एका बाजूला बंदुका आणि दुसर्‍या बाजूला बाण आणि भाले यांच्या विषम लढाईत नागांना गाव सोडून माघार घ्यावी लागली. ब्रिटीशांनी मोकळ्या झालेल्या गांवामध्ये प्रवेश करून नागां लोकांच्या वस्त्या जाळून टाकल्या. मणिपुरच्या खिक्रूमा गावापर्यंत हा संघर्ष जेव्हा पोहोचला तेव्हा तिथल्या रहिवाशांनी जोरदार विरोध केला आणि सुमारे शंभरच्यावर गावकरी कामी आले. कोहीमापर्यंत हा सिलसिला सुरू होता. शेकडो नागा योध्ये कामी आले आणि ब्रिटीशांवरचे हल्ले सुरूच राहिले. शेवटी गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने ही मोहीम थांबवण्याचं ठरवलं आणि तिथल्या पोलिस चौक्यांमधून शिपायी माघारी बोलावले.

स्थानिक नागा ज्या लोकांना ‘कंपनी मॅन’ म्हणून ओळखत त्या ब्रिटीशांना त्यानी आपल्या भूमीवर थारा दिला नाही. 1879 पुन्हा एकदा ब्रिटीशानी दिमंत या राजकीय अधिकार्‍याला सैनिकी सौरक्षणात नागा भूमीवर पाठवलं. अंगामी योध्यांनी त्या अधिकार्‍य़ा बरोबरच त्याच्या सोबत असलेल्या 39 सैनिकांना कंठस्नान घातलं आणि बाकिचे सैनिक जंगलात पळून गेले. पण याच सुमारास तिथे ख्रिश्चन मिशनर्‍यांनी यायला सुरूवात केली होती. नागा लोकांपैकी काहींना त्यांनी आपल्या धर्माची दिक्षा दिली होती तेच लोक मग ब्रिटीशांना हेरगिरीसाठी वापरता आले. असं असलं तरी शूर नागा लोकांनी संघर्ष सुरू ठेवला ब्रिटीशांनी पुन्हा माघार घेतली.

1880 मध्ये पुन्हा एकदा मोठ्या फौजफाट्यासह ब्रिगेडीयर जनरल जे.एल. नॅशनच्या नेतृत्वाखाली मणिपुरवर हल्ला केला गेला. नागा जनतेने दर्‍याखोर्‍यांचा आसरा घेवून गनिमी युद्ध चालू ठेवलं. ब्रिटीश सैनिकांनी कोहीमा गावाला आग लावून ते भस्मसात केलं. पण नागांचा संघर्ष चालूच होता. त्यानी ब्रिटीशांच्या ताब्यातील चहाच्या मळ्यांवर हल्ला चढवला आणि सोळा कामगारांसह मॅनेजरला ठार केलं. पण परतीच्या रस्त्यावर नॅशनने त्यांची कोंडी केली आणि अन्न पाण्याविना नागा लढवैयाना प्राण गमावण्याची पाळी आली. शेवटी नागांनी शस्त्र खाली ठेवली. नागांना जबर दंड ठोठावण्यात आला. सर्व शस्त्रात्रं काढून घेण्यात आली. त्याची शेतं आणि गावं जप्त करण्यात आली तसंच चहामळ्यांवर गुलाम म्हणून नेण्यात आलं. ब्रिटीशांनी विजय महोत्सव साजरा केला आणि गव्हर्नरला सगळा वृतांत तारेने कळवण्यात आला.

एवढ्या सगळ्या मोहिमानंतरही नागांचा संघर्ष सुरूच राहिला. आपल्या शेतात, दर्‍याखोर्‍यात वास्तव्य करून ते ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडत होते. या वेळी मात्र मिशनरी ब्रिटीशांना सहाय्यकारी झाले. हळूहळू बदल होत होता. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ‘आझाद हिंद सेना’ कोहिमाला पोहोचली तेव्हा याच नागावीरांनी त्यांना मदत केली, नेताजींच्या आझाद हिंद सेनेने तिथे ब्रिटीशांचा पराभव केला. 

हेच नागा धर्मांतरानंतर मात्र बदलले. स्वातत्र्यानंतर तिथे आपल्याच देशाविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. आपल्या स्वातंत्र्याचं प्राणपणाने रक्षण करणारे आणि ब्रिटीशांना सळोकीपळो करून सोडणारे  नागा आता मात्र आपल्याच नागरीकांचे आणि जवानांचे शत्रू झाले आहेत, हत्या करीत आहेत.     

                                                                     

Tuesday, January 20, 2015

पुर्वांचल: फिरायलाच हवा

संगत्सर लेक 
सन २००४ ची गोष्ट. लोकसत्ता मध्ये ‘तळ्यांचं तवांग’ हा लेख वाचल्यापासून मला पुर्वांचलाला जायची ओढ लागून राहिली होती. तवांग आपल्या देशाच्या पुर्वोत्तर सीमेला लागून असलेला भाग. अरुणाचल प्रदेश मधलं हे ठिकाण पुर्वांचलाचं प्रवेशव्दार समजल्या जाणार्‍या गुवाहाटीपासूनही शेकडो कि.मी. दूर आहे. तिकडे जायचं असं मनाने नक्की केलं असलं तरी तेव्हा ते एवढं सोप नव्हतं. असं असलं तरी जिथे जायचं तिथली माहिती गोळा करावी म्हणून मी त्या कामाला लागलो. त्या वेळी आत्ता एवढं माहितीचं महाजाल सक्षम नव्हतं आणि पर्यटन महामंडळाकडची माहिती अद्यावत नव्हती. एवढ्यात युथ हॉस्टेलच्या एका छोट्याश्या बातमीने माझं लक्ष वेधलं. तवांगची आठ दिवसाची एक सहल युथ हॉस्टेल नेणार होतं, मी त्या सहलीसाठी नाव नोंदणी केली. मात्र पुर्ण पैसे भरायला गेलो तेव्हा निराश झालो कारण त्यानी ती सहल रद्द केली होती. माझ्याच देशात मला हवं तिथे जायचं असलं तर आणखी कोण कशाला हवं असा विचार मनात आला आणि तवांगलाही स्वत:च जायचं असं ठरवून टाकलं. माझ्या बरोबर माझी पत्नी आणि मुलगीही यायला तयार झाली.  

तळ्यांचं तवांग
पुर्वांचल गाठायचंच अस मनात नक्की केलं तरी सहलीची रुपरेषा ठरवतानाच अडचणी येवू लगल्या, तशातच गुवाहाटीला बॉम्बस्फोट झाले. तिकडे जायचा माझा बेत ऎकून सर्वच मित्रपरिवाराने मला त्या पासून परवृत्त करण्याचा प्रयत्न केला. मी माहिती जमवत होतो. ती महिती जमवता जमवता तवांगला जाण्यासाठी Inner Line Permit (ILP) घ्यावं लागतं हे समजलं. आता हे ILP कसं मिळवायचं? अरुणाचल प्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरकडून ते मिळतं याची महिती मिळाली. हे कमिशनर कोलकाता, गुवाहाटी, तेजपूर या ठिकाणी असतात. मुंबईतल्या माणसाला ती कशी मिळायची? कोलकात्याला संपर्क साधून बघितला पण प्रत्यक्ष तिथे गेल्यानंतरच ते मिळणार असं समजलं. इनर लाईन परमीट मिळाल्याशिवाय हॉटेल बुकिंग तरी कसं करणार? पुर्वांचलात फोन एकतर लागत नव्हते किंवा लागले तर ते चुकीच्या ठिकाणी लागत होते.  अनेक अडचणी समोर दिसत असतानाच मुंबईत सचिवालय जिमखान्यात पुर्वांचल मधल्या राज्यांचा हस्तकला मेळावा लागला. तिकडे गेलो. बहुतेक लोक गुवाहाटीचे होते. त्यांच्या जवळ तिथल्या परिस्थिती विषयी चौकशी केली. गुवाहाटीत झालेल्या बॉम्बस्फोटाबाबत विचारलं तेव्हा ते म्हणाले आम्हीसुद्धा मुंबईत यायला घाबरत होतो. मुंबईतही बॉम्बस्फोट झाले होतेच ना? एकूण काय भिती बळगली तर घराबाहेरच पडायला नको. त्या मेळाव्यात आलेले पुर्वांचलातील लोक आथित्यशील वाटले. त्यांनी आपले फोन नंबर, कार्ड दिली. गुवाहाटीत आल्यास मदत करायची तयारी दाखवली. माझा उत्साह वाढला.

ब्रॅन्ड ऍम्बॅसीडर  
पुर्वाचलात फोन लागत नव्हते पण एक फोन बरोबर लागला आणि माझं काम हलकं झालं. काझिरंगा नॅशनल पार्कच्या बोनानी लॉजचा फोन पटकन उचलला गेला आणि पलिकडून आश्वासक आवाज ऎकू आला. बोनानी लॉजचे व्यवस्थापक श्री. सैकिया बोलत होते. अगदी विनंम्रपणे त्यानी सर्व महिती दिली. त्या लॅजमधली खोली आरक्षित करण्यासाठी लागणारा डिमांड ड्राफ्ट बोकाखाट शाखेवर काढावा असं सांगितलं तसंच माझ्या अनेक शंकांना योग्य उत्तरं दिली. हे बोनानी लॉज आसम सरकारच्या पर्यटन खात्याचं आहे हे विशेष. या एका आधारामुळे मी आश्वस्त झालो. मुंबईहून तवांगला तीन हजार किलोमीटर पेक्षा जास्त अंतर पार करून जायचं तर पुर्वांचलातील इतरही भाग पहायला हवा असं वाटत होतं. काझिरंगा बरोबरच गुवाहाटी, तेजपूर, शिलॉंग, चेरापुंजी अशी अनेक ठिकाणं साद घालू लागली. एवढं सगळं फिरायचं तर पंधरा दिवसांपेक्षा जास्त दिवस लागणार होते. एवढ्यालांब आपण जाणार तर ते फिरलच पाहिजे हेही लगोलग ठरवून टाकलं. सगळे नकाशे, फिरण्याची ठिकाणं, त्यांच्या मधलं अंतर, अवघड रस्ते असल्याने त्या वरून प्रवास करायला लागणारा वेळ या सर्वांचं गणीत करताना सहलीचा आनंद आणखी वाढत होता. आपल्याला कुठेही सहलीला जायचं असेल ना तर शक्य तेवढ्या लवकर त्या सहलीचं आयोजन करावं कारण सहल ठरल्यापासूनच त्या सहलीची खरी सुरूवात होत असते. काय पहावं, कसं पहावं, रस्ते कसे आहेत, रहाण्या-जेवण्याची काय व्यवस्था होईल हे नक्की करताना आपण नकळत त्या भागात जावून पोहोचतो आणि आपलं मन त्या प्रदेशाची एक आभासी सहल करायला लागतं. पुर्वांचलाचा अभ्यास करता करता मला त्याने खरंच वेड लावलं.
बोनानी लॉजचं आरक्षण पार पडलं तरी बाकी ठिकाणी राहण्याची काय व्यवस्था करायची ते ठरेना कारण एकच Inner Line Permit. काहीही करून जायचंच हे तर नक्की होतं. मग रेल्वे आरक्षणाची स्थिती पाहिली तेव्हा गितांजली एक्सप्रेसचं आरक्षण मिळणार नाही हे समजलं. कोलकत्याला जाण्यासाठी मग हावडा मेलचा वेळकाढू प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. कोलकात्या मध्ये दोन दिवस फिरावं, जमलंतर तिथेच अरुणाचल प्रदेशच्या रेसिडेंट कमिशनरकडून Inner Line Permit मिळतं का पहावं. असा बेत होता. कोलकाता ते गुवाहाटीचं विमानाचं तिकीट काढलं आणि गुवाहाटी पर्यंतचं जाणं नक्की झालं. पुढे इनर लाईन परमीट मिळालं तर तवांगला जावं किंवा पर्यायी ठिकाणांचं स्थलदर्शन करावं असा विचार करून परतीच्या प्रवासाचंही आरक्षण केलं. (या सहली नंतर पुर्वांचलाच्या आणखी दोन सफरी माझे मित्र ईशा टूर्सचे संचालक श्री. आत्माराम परब यांच्या सोबत केल्या. ठरलेल्या वेळी आणि ठरलेल्या ठिकाणी सर्व सेवा-सुविधा हात जोडून उभ्या होत्या. पर्यटन संस्था आणि आपण स्वत:च केलेल्या सहलीत फरक तर असायचाच)

कोलकात्याचा दोन दिवसांचा मुक्काम संपवून भल्या पहाटे नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळ गाठला. इंडीयन एअरलाईंसचं विमान पाच तास उशिराने सुटणार होतं. इनर लाईन परमीटचं काम कोलकात्यात झालं नव्हतं. सकाळी लवकर गुवाहाटीत पोहोचून ते मिळवण्याचा माझा प्रयत्न आणखी पाच तासांनी  पुढे गेला. साधारण अकराच्या सुमारास गुवाहाटीच्या लोकप्रिय गोपिनाथ बार्डोलोई आंतराष्ट्रीय विमानतळावर उतरलो. खरं तर इथून आम्हाला काझिरंगाला जायचं होतं. पण पुन्हा इनर लाईन परमीटचं काम समोर दिसत होतं आणि ते गुवाहाटीलाच करावं लागणार होतं. शहरात जाण्यासाठी टॅक्सी केली आणि रेसिडेंट कमिशनर अरुणाचल प्रदेश यांच्या पत्त्यावर गेलो पण तिथलं कार्यालय दुसरीकडे स्थलांतरीत झालं होतं. दोन तासांच्या शोधाशोधी नंतर एका निवासी इमारतीमध्ये त्याचा पत्ता लागला. मला कोलंबसची सारखी आठवण येत होती.

रेसिडेंट कमिशनर अरुणाचल प्रदेश असा फलक सुद्धा नसलेल्या त्या इमारतीत कार्यालय कुठलं तेच समजत नव्हतं. दोन बाया एका लिहिण्याच्या टेबलावर पाय वर घेवून खिडकी शेजारी बसल्या होत्या. त्यांच्या जवळ चौकशी केली तेव्हा समजलं की मला हवं असलेलं कार्यालय तेच आहे. मी त्या कार्यालयामध्ये प्रवेश मिळवला आणि त्याना मी तिथे येण्याचं प्रयोजन सांगितलं. त्यांचे साहेब कार्यालयात नव्हते आणि ते परत कधी येणार याची त्याना काहिच माहिती नव्हती. थोडं खावून घ्यावं आणि पुन्हा प्रयत्न करावा म्हणून मी बाजाराकडे वळलो. पुन्हा अर्ध्या पाऊण तासाने त्या कार्यालयात गेलो तर साहेब नुकतेच आले होते. त्याना माझी फाईल आणि फॉर्म दाखवला. अरुणाचल मध्ये कशाकरीता जायचं आहे? असा त्यांच्या प्रश्न होता. तो माझ्या देशाचा भाग आहे आणि तो आम्हाला पहायचा आहे. माझ्या बरोबर माझी बायको आणि मुलगी आहे त्याना आत बोलावतो असं सांगून मी त्यानाही आत बोलावलं. साहेबाना माझं म्हणणं पटलं आणि त्यानी इनर लाईन परमीट देण्याच्या सुचना दिल्या. ते तयार होईपर्यंत बोलताना ते म्हणाले की पुढच्या चार दिवसात २५ खासदारांचा अरुणाचल प्रदेशचा दौरा आहे, तुम्ही हॉटेल बुकिंग केलं आहे का? अर्थातच माझं उत्तर नाही असं होतं. इनर लाईन परमीट मिळाल्याशिवाय मी आरक्षण करणार तरी कसं?

हाच रस्ता आपल्याला बोलावतो आहे. 
इनर लाईन परमीट मिळलं, आता लवकरात लवकर काझिरंगाला गेलं पाहिजे म्हणून मी घाईत होतो. दुपारचे तीन वाजून गेले होते. ज्या बाईनी इनर लाईन परमीट दिलं त्यांचं लक्ष माझ्या मुलीकडे गेलं. या एवढ्या छोट्या मुलीला घेवून तुम्ही आता काझिरंगाला जाणार का? असं म्हणत असताना त्या बाईच्या डोळ्यात पाणी आलं. आता खुप उशीर झाला आहे तुम्ही उद्या जा असा त्यांचा सल्ला होता. आमच्यातला संवाद हिंदीतून होत होता. ठिक आहे आम्ही जावू असं म्हणत मी त्यांचे आभार मानले आणि पुन्हा मुख्य रस्त्यावर आलो. चौकशी केली तेव्हा आम्हाला आता पलटन बाजार इथे जावं लागणार होतं.

पलटन बाजारला गेलो आणि काझिरंगाला जाण्यासाठी चौकशी केली तेव्हा समजलं की तिकडे जाणारी सगळी वाहनं निघून गेली होती. आणि आता पुढचं वाहन दुसर्‍या दिवशी सकाळी निघणार होतं. आता संध्याकाळचे चार वाजत आले होते आणि दिवस अस्ताला जायच्या तयारीत होता. आम्ही मुंबईहून गुवाहाटीला म्हणजे पश्चिमेकडून पुर्वेला गेलो होतो त्यामुळे दिवस लवकर मावळणार होता. काही करून मला काझिरंगाला पोहोचायचंच होतं. मुंबईत नेहमी रात्रीचा प्रवास करणारे आपण हा प्रवास सहज करू असं वाटत होतं. थोडी फार चौकशी केल्यावर एक तरूण त्याची खाजगी गाडी घेवून यायला तयार झाला. अखेर आम्ही काझिरंगाकडे प्रयाण केलं. या सगळ्या गडबडीमुळे एवढा वेळ बाहेरच्या दुनियेकडे पाहायला वेळच मिळाला नव्हता. आता गाडीत बसल्या बसल्या बाहेर बघताना नाविन्याचा आभास व्हायला लागला. ब्रम्हपुत्रेचं पात्र संध्याकाळच्या प्रकाशात गडद होत चाललं होतं. एखाद्या समुद्रासारखं ते पात्र अफाट पसरलं होतं. पुढे दिसपूर मधली असम सरकारची कार्यालयं दिसायला लागली. हे दिसपूरच असमचं राजधानीचं शहर आहे. पुराणकाळातलं प्रागज्योतिषपूर. पुर्वी कधीतरी वाचलेले संदर्भ आठवायला लागले. पुढे उजव्या बाजूला कामाख्या देवस्थानाकडे जाणारी कमान दिसली. गोव्याला जे कामाक्षीचं मंदिर आहे त्याचं हे मुळ पीठ. आता दुतर्फा झाड झाडोरा वाढू लागला. तो नोहेंबर महिना होता. हवेत बराच गारवा होता. हिमालयाच्या पुर्वरांगांमधून आमचा प्रवास सुरू होता. संधीप्रकाशाला जास्त संधी न देता आता काळोखाचं साम्राज्य सुरू झालं. दाट जंगलातून वळणं घेत गाडी चालली होती. अभयारण्याचा भाग सुरू झाला आणि ‘जंगली हत्तीं पासून सावध रहा’ असे फलक दिसायला लागले. जंगली हत्ती रस्त्यावर आले की सगळी वाहतूक थांबवली जाते. रात्रीच्या वेळी या जंगलातून प्रवास करणं धोक्याच आहे म्हणूनच तर मघाशी रेसिडेंट कमिशनरच्या कार्यालयातील बाईंना आमची काळजी वाटली होती.

काझिरंगामधल्या नागमोड्या वाटा 
काझीरंगाच्या मुख्य गेट समोरून एक सफाईदार वळण घेवून गाडी पुढे गेली आणि थोड्याश्या उंचवट्यावरील बोनानी लॉज समोर थांबली. गुवाहाटीपासून १९० किलोमीटर एवढा प्रवास करून आम्ही मुक्कामाला पोहोचलो होतो.  दिवस असता तर बाहेरचा रम्य देखावा पाहाता आला असता. असो पुढचे बारा-तेरा दिवस तो न्याहाळणारच होत. रात्रीचे नऊ वाजत होते. स्वागत कक्षात व्यवस्थापक श्री. सैकिया आमच्या स्वागताला तयारच होते. अगदी हात जोडून त्यानी आमचं स्वागत केलं. आधी जेवून घ्या, नंतर बोलू असं म्हणून त्यानी आमची रवानगी डयनींग हॉल मध्ये केली. जेवणं झाल्यावर पुन्हा सैकियांशी बोलणं झालं. एखाद्या जवळच्या मित्राप्रमाणे त्यानी आमची विचारपूस केली. दुसर्‍या दिवशी पहाटेच्या सफारीची सोय करून दिली आणि माझ्या पुढच्या प्रवासाबद्दलचे सर्व प्रश्न ऎकून घेतले व दुसर्‍या दिवशी सगळी सोय करून देतो निश्चिंत रहा असं आश्वासन दिलं. सैकियाना भेटल्याने माझा सगळा ताण हलका झाला. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ अशी शाळेत म्हटलेली प्रतिज्ञा त्यानी सार्थ ठरवली होती.

पुर्वांचलातील एक रम्य संध्याकाळ 


               

                          

Monday, January 19, 2015

राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?

नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांचा परखड सवाल.  

‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं? देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे’ असं परखड मत नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी नुकतंच मुंबई येथे मांडलं. जुहू, मुंबई येथे इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर ने बांधलेल्या राणी मॉं गायडिन्ल्यु भवनाचं उद्घाटन करताना त्यानी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणाचा गोषवारा आणि समारंभाचा वृतांत.

गेल्या चाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ इशान्येकडच्या राज्यात कार्यरत असलेल्या आणि आता नागालॅन्ड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या पद्मनाभ आचार्य यांनी जुहू, मुंबई येथे इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर ने बांधलेल्या राणी मॉं गायडिन्ल्यु भवनाचं उद्घाटन नुकतंच केलं. पुर्वांचलातील जनतेला देशाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचं काम या भवनातून होईल.

सनदी लेखापाल असलेले श्री. दिलिप परांजपे यांनी उपस्थिताना राज्यपालांच्या कार्याची ओळख करून दिली.  महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अखिल भारतिय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुर्वांचलात   पद्मनाभ आचार्ययांच्या  बरोबरीने काम करीत असताना आलेल्या अनुभवांचा आलेखच त्यानी यावेळी मांडला. जनरल करीअप्पांना भेटण्यासाठी ओव्हल मैदानात व्यतीत केलेली रात्र, टाटा, गोदरेज, गोविंदभाई श्रॉफ अशा दिग्गज उद्योजकांच्या त्या काळात घेतलेल्या  भेटी  यांचे  किस्से ऎकताना श्रोते मंत्रमुग्ध झाले. या नंतर सुमारे चाळीस मिनिटं केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात मा. राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी कार्यकर्ता कसा असावा, राष्ट्रपेम म्हणजे काय याचा पटच उभा केला. या प्रसंगी बोलताना राज्यपाल महोदय म्हणाले:  

ईशान्य वार्ताचे संपादक पुरूषोत्तम रानडे आणि समंवयक संजय काठे यांच्याशी वार्तालाप करताना मा. ना. पद्मनाभ आचार्य.  
इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरच्या माध्यमातून पुर्वांचलासाठी मुंबईमध्ये राहून आपण काय करू शकतो या विचारच खुप मोठा आहे. पुर्वांचलामधल्या लोकांना मुंबईत राणी मॉं गायडिन्ल्यु यांच्या नावाने एक भवन उभं राहिलय हे ऎकूनच किती बरं वाटलं आहे. आपल्यात राष्ट्रीय भावनेची कमतरता का आहे? याचा विचार आपण केला पाहिजे, तो काही मंडळींनी केला आणि या भवनाची उभारणी झाली. आपण भारतमाता की जय असं म्हणतो. ही भारतमाता कोण आहे? हिच्या कुठल्याही अंगाला काही दुखापत झाली तर आपली प्रतिक्रिया काय असते? काय असली पाहिजे? १९६२ साली चीनचं आक्रमण झालं, तेव्हाची गोष्ट, तेव्हा आम्ही विद्यार्थी परिषदेचं काम करीत होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम करीत होतो. पंतप्रधान नेहरूंना प्रचंड धक्का बसला होता. वर्तमान पत्र, रेडीओ वरून या आक्रमणाची वार्तापत्र कानी येत होती. आम्ही शिकलेले होतो, रोज वर्तमानपत्र वाचत होतो, एवढं असूनही NEFA म्हणजे काय याची कल्पना आम्हाला नव्हती. मात्र लहानपणापासून संघाचे संस्कार आमच्यावर झाले होते. आपल्या देशावर आक्रमण झालं आहे, आपण या मध्ये काहीतरी केलं पाहिजे या भवनेने आम्ही पुर्वांचलात जावून पोहोचलो. अप्रतिम निसर्ग सौदर्याने भरून राहिलेली हा प्रदेश पाहिला आणि आम्ही अचंबीत झालो. आमची पाटी कोरी होती. मोकळ्या मनाने आम्ही तिथल्या लोकांना भेटलो. तेव्हा लक्षात आलं मिझोराम, नागालॅन्ड, अरुणाचल प्रदेश, नेफा आसाम या भागातल्या कितीतरी लोकांनी भारत स्वतंत्र व्हावा म्हणून प्रयत्न केले होते, बलिदान दिलं होतं. त्या ठिकाणी कसलाच विकास झाला नव्हता. सोयी-सुविधा नव्हत्या असं असूनही नागालॅन्ड मधल्या राणी मॉं गायडिन्ल्यु, मेघालयातचे तिरोत सिंह, अरुणाचल प्रदेश मधील अबोर लिरेंग अशा अनोक महारथींनी देशासाठी खस्ता खाल्ल्या. सर्व सुविधा असताना काम करणं निराळं आणि पुर्वांचलासारख्या दुर्गम भागात काम करणं निराळं. आजही तो भाग तसाच आहे, संकटात आहे. मुळातच या प्रदेशाचा ९८% भाग हा आंतरराष्ट्रीय सीमांनी वेढलेला आहे, फक्त दोन टक्के भूभाग भारताशी जोडलेला असल्याने या राज्यांचे प्रशन हे वेगळे आहेत. एका बाजूला आक्रमक चीन दुसर्‍या बाजूला घुसखोर बांगलादेश, तिकडे म्यानमार अशा देशांच्या सीमांनी व्याप्त असलेली ही राज्यं आपल्याच भारत मातेची अंग आहेत. अरुणाचल प्रदेश सारखं अख्खं राज्य आपलंच आहे असं चीन म्हणतो, कोणतंही सार्वभौम राष्ट्र हे स्विकारू शकत नाही. हा बाह्य धोका तर दिडशेहून जास्त फुटीर गट आपणाला स्वतंत्र व्हायचंय म्हणून सशस्त्र क्रांती किंवा आंदोलन करीत आहेत, असा आंतर्गत धोका.  लाखो घुसखोर बांगलादेश मधून आले आहेत. म्यानमारच्या सीमेवर अतिरेकी प्रशिक्षण केंद्र आहेत. चीन मधून प्रशिक्षीत आतंकवादी या भागात येत असतात. इथली जनाता या लोकांच्या भुलथापांना का बळी पडते आहे? नक्षलवादी का तयार होतात? याचा विचार केला तर असं लक्षात येतं की गेली साठ वर्ष सातत्याने हा भाग दुर्लक्षीततच राहिला आहे. आसाममध्ये कमीतकमी तीस विधानसभा क्षेत्रं अशी आहेत की ज्यात आपण प्रवेशही करू शकत नाही एवढे बांगलादेशी तिथे भरलेले आहेत. ऑल आसाम स्टुडंट युनियनने फार मोठं आदोलन या विरोधात उभारलं तरीही स्थिती बदललेली नाही.

तिथली जनाता डोंगर दर्‍यांमध्ये वास्तव्य करते. त्या काळी अगोदरच्या नेफा मध्ये आम्हाला जायचं होतं. मी आणि दिलीप परांजपे तिथे जायला निघालो. जे.बी. पटनाईकांनी तिथे मिठाचा पुरवठा करण्यासाठी कलिंग एअरलाईंस ची स्थापना केली होती. विमानातून मिठाच्या बोर्‍या ठिकठिकाणे टाकल्या जात. त्या विमानातून आमच्या वजनाच्या गोण्या खाली काढून आम्हाला बसवलं गेलं आणि आम्ही पासी घाट इथं पोहोचलो. आमच्याबरोबर एक पोलिटीकल ऑफिसर होते. वेगवेगळ्या जन-जातीच्या लोकांनी नृत्य करून आमचं स्वागत केलं. सुंदर दृष्य होतं ते. हे सर्व पहात असताना लक्षात येते गेलं की हे लोक भारतीयच आहेत. यांनाही आपल्यासरखाच मतदानाचा हक्क आहे. यांच्या सारखं एकच मत आपल्याला देता येतं, लोकशाही प्रक्रियेत सगळे समान असताना या लोकाशी एवढे दिवस जो भेदभाव केला गेला त्याला आपणच कारण आहोत. यांच्यावर जो अन्याय झाला किंवा होत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत आणि याना काही मदत करायची झाली तर ती प्रायश्चित्ताच्या भावनेने केली पाहिजे, उपकाराच्या भावनेतून नाही. या समाजाचं आपण काही देणं लागतो.

आपल्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदलाची आवश्यकता आहे. व्यक्ती केंद्रीत शिक्षण, जे ब्रिटीशांनी केवळ कारकूनांची फौज निर्माण करण्याकरीता राबवलं तीच पद्धती आजही राबवली जात असल्याने देशप्रेम आपल्याला शिकवावं लागतं. चाळीस वर्षांपुर्वीची गोष्ट आहे, त्या वेळी आम्ही विद्यार्थीपरिषदेचं काम करीत असताना एक जपानी विद्यार्थी मुंबईत माटुंग्याच्या कार्यालयात आला होता. आठ दिवस तो आमचं काम पहात होता, मुलाखती घेत होता. त्याला ते समजत नव्हतं, अखेर त्याने विचारलं की तुमचं मुख्य उद्देश काय आहेत? आम्ही म्हटलं ‘राष्ट्रप्रेम’, तो अचंबीत झाला म्हणाला “काय ‘राष्ट्रप्रेम शिकवावं का लागतं?  ते निसर्गत:च असलं पाहिजे. देशप्रेम हे रक्तातच असलं पाहिजे. तुम्ही जर एवढी मोठी संस्था या कामासाठी उभारली असेल तर तुमच्या जीवनपद्धतीतच काहीतरी दोष आहे.” त्याच्या या प्रतिक्रियेनंतर आमच्याही लक्षात आलं की आपण भारतासाठी, आपल्या मातृभूमी काही केलं पाहीजे याचं बाळकडूच आम्हाला शिक्षणातून मिळालं नसल्यानेच आपल्याला या विपनावस्थेतून जावं लागत आहे. काम करीत असताना आम्ही नागालॅन्ड मधल्या मोंड या ठिकाणी गेलो. तिथल्या जनजातीच्या राजाने आमचं मिठीमारून स्वागत केलं, आसनावर बसवलं आणि त्याच्याजवळ असलेलं सर्वात उत्तम रत्न आम्हाला देवू केलं. हा बंधूभाव, ‘अथिती देवो भव’ हा भाव त्यांच्या जवळ आहे तर आपण नागरी वस्तीत वाढलेले, उत्तम शिक्षण घेतलेले असताना आपण ते संस्कार का हरवून बसलो आहोत.                         

तिथे केरळचे मिशनरी आधीपासूनच काम करीत होते. मग आम्ही पोहोचलो. आज दुरदर्शनवर तिथली जनता शहरातील लोक किती मजेत आहेत ते पहातात, काय खातात ते पहातात आणि तिथले लोक किडे खातात. एवढं अंतर का? याचा विचार केला पाहिजे. ‘भारत मेरा देश है’ म्हणत असताना ही दरी कशी कमी होईल हे पाहिलं पाहिजे. आसाम मधल्या तेलाच्या विहिरी, पुर्वांचलात सर्वत्र आढळून येणर्‍या कोळशाच्या खाणी, विपूल वन संपदा, जल संपदा एवढं सगळं असतानाही तिथे अभ्यास करण्यासाठी लागणारी वीज नाही, तो भाग मागास का राहिला याचा विचार झाला पाहीजे. स्वातंत्र्याची फळं सर्वानाच मिळाली पाहिजेत. काही ठरावीक लोकांच्या हातातच संपत्ती एकवटली आहे ते चित्र बदललं गेलं पाहिजे. आपण सर्वांनी त्यात आपला वाटा उचलला पाहिजे. इथे बसून आता मी हा ‘ईशान्य वार्ता’चा अंक पहात होतो. हा ज्यानी कोणी काढला आहे त्यानी केवढं मोठं काम केलं आहे.

मिशनरी लोक छोटीशी वस्ती असली तरी शाळा सुरू करतात. माझ्या उडुपी या गावात केवळ तीनशे ख्रिश्चन असताना त्यांनी शाळा, त्याच्या बाजुला हॉस्पिटल, अनाथालय सुरू केलं. आपण देवळं बांधतो, देवाला सोन्याने मढवतो, जेवणावळी उठवतो. पण समाजाला काय देतो. दरिद्री नारायणाची सेवा आपण कधी करणार? १९८२ साली एक माणूस आणि एक टेबलवर इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरचं काम सुरू झालं तेव्हा ते काम एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढेल असा विचार केला नव्हता.

आज देशात एक चेतनामय वातवरण आहे. पंतप्रधानांनी जन-धन योजना सुरू केली आहे. मी नागालॅन्ड राज भवनात माळीकाम करणार्‍या कामगारांना भोजनाचं आमंत्रण देवून त्याची विचारपूस केली आणि नागालॅन्ड राजभवनातून राज्यपाल या नात्याने मी त्या योजनेला चालना देण्याचं काम केलं आहे. मोठमोठ्या उद्येगपतींना तीन टक्क्याने कर्ज देण्यासाठी बॅका त्यांच्या घरी जातात पण बारा टक्के व्याज देवूकरणार्‍या स्वयंरोजगार कर्त्याला त्रास दिला जातो. जन-धन योजनेत हे चित्र बदललं जाईल. पहिल्याच दिवसात संपुर्ण देशातून दोन करोडच्या वर लोकांनी बचत खाती उघडली. हे काम आपण सर्वांनी पुढे नेलं पाहिजे.

आपल्या देशात 720 भाषा, बोलीभाषा बोलल्या जातात. पुर्वांचलात हे प्रमाण जास्त आहे. मुबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ अनेक विदेशी भाषा शिकवतात. या विद्यापीठानी जर या पुर्वांचलातील भाषा शिकवण्याचा सहा महिन्यांचा प्रमाणपत्र अभ्याक्रम सुरू केला तर पुर्वांचलातील मुंबईत काम करणारे लोक त्या भाषा शिकवायला तयार आहेत. पुर्वांचलातील माणसं या मुळे आपल्याशी जोडली जातील. मुंबईत आपली भाषा शिकवली जाते हे ऎकूनच त्यांना आनंद होईल. देश जोडण्याच्या असे अनेक पर्याय आहेत. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटरमध्ये हे काम जोमाने केलं जाईल. नागालॅन्डमध्ये आम्ही हे काम सुरू केलं आहे. नागालॅन्डच्या राज्यपालाची पत्नी तिथल्या सर्वजनिक शाळेत जाऊन शिकवायला लागली आहे. शिकलेल्या, पदवीधर महिलांनी; ज्या घरीच असतात त्यांनी शांळांमध्ये जावून विद्यादान करायला सुरूवात केली तर तिथली उपस्थिती वाढेल आणि विद्यार्थ्यांचं भवितव्य उज्वल बनेल.

नागालॅन्ड मध्ये राज्यपाल म्हणून मी गेलो आहे, स्वेच्छेने गेलो आहे. तिथला राज्यपाल ही शिक्षा कशी असू शकते. पुर्वांचलात आपण गेलं पाहिजे. तुमचं सर्वांचं तिथे स्वागत आहे. ‘ईशान्य वार्ता’ने हे काम सुरू केलं आहे. इंडियन नॅशनल फेलोशिप सेंटर हे काम करीत आहे. पुर्वांचलात आपण या. आपलं सर्वांचं तिथे स्वागत आहे.            

महामहीम राज्यपालांच्या या भाषणानंतर सर्व सभागृह अंतरमुख झालं होतं. त्याच भारलेल्या वातावरणात ईशान्य वार्ताचे संपादक श्री. पुरूषोत्तम रानडे यांचा आणि अन्य मान्यवरांचा राज्यपालानी नगालॅन्डच्या भेटवस्तू देवून सत्कार केला. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात साजर्‍या होणार्‍या  नागालॅन्डच्या हॉर्नबिल फोस्टीव्हलसाठी सर्वांना आमंत्रित करून या कार्यक्रमाची सांगता झाली. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...