Showing posts with label गाव. Show all posts
Showing posts with label गाव. Show all posts

Saturday, January 24, 2015

लोटे परशुराम ते परशुराम कुंड

परशुरामाने जोडलेला दुवा

त्रेता युगापासून संपुर्ण भारत वर्षात एक आख्याईका बनुन राहीलेल्या भगवान परशुरामाने त्या काळात  हिंदुस्थानभर संचार केल्याच्या खुणा सापडतात. आपल्या असामान्य पराक्रमाच्या जोरावर त्यानी दुष्ट आणि नराधम राज्यांचा निप्पात केला आणि धर्माचं राज्य स्थापन करण्यासाठी जिवाचं रान केलं.

परशुरामाने बाण मारून समुद्र मागे हटवला आणि कोकण प्रांताची निर्मिती केली असं म्हटलं जातं. भारतात समुद्रालगतच्या अनेक ठिकाणी हिच कथा सांगितली जाते. कोकण प्रांताला तर परशुराम भूमी म्हणूनच ओळखलं जातं. तिकडे देशाच्या पुर्वोत्तर राज्यातही परशुरामाच्या पराक्रमाच्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात. मातृ आणि पितृ भक्त परशुराम तर जगविख्यात आहे. पित्याच्या आदेशाला शिरसावंद्य मानून त्याने स्वत:च्या आईचंच शिर धडावेगळं केलं आणि पुन्हा पिता प्रसन्न होताच आईसाठी जीवन मागून घेतलं. आईच्या हत्तेचं हे पाप धुण्यासाठी त्याने ज्या कुंडात उडी टाकली त्या लोहीत नदी मधल्या कुंडाला परशुराम कुंड म्हणून ओळखलं जातं. त्या काळापासूनच दर संक्रातीला या कुंडात स्नान करण्यासाठी हजारो श्राद्धाळू एकत्र येत असतात.

या वर्षीच्या मकरसंक्रातीच्या पवित्रस्नाच्या वेळी पन्नास हजार भाविकांनी परशुराम कुंडाला भेट दिली. त्यापैकी तीस हजार यात्रेकरू भारताच्या विविध भागातून आले होते अशी माहिती लोहीत जिल्ह्याच्या वाक्रो प्रांताचे अतिरीक्त सहाय्यक आयुक्त श्री. दाक्तो रिबा यांनी दिली आहे. यात्रेकरूंची ही संख्या गतवर्षा पेक्षा कमी आहे असंही रीबा म्हणाले. यात्रेकरूंची ही घटती संख्या प्रशासनालाही अपेक्षीत नव्हती.

आपल्या अरुणाचल प्रदेश राज्यातला लोहीत जिल्हा निसर्गसंपदा आणि सौदर्याने भरलेला आहे. या जिल्ह्यातून वाहणार्‍या लोहीत नदीवरूनच या जिल्ह्याला लोहीत हे नाव दिलं गेलं आहे. अनेक पौराणिक आणि ऎतिहासिक कथांशी जोडल्यागेलेल्या या ठिकाणी पर्यटनाला खुपच वाव आहे. शहरी प्रदुषणाचा मागमुस नसलेला हा प्रांत बर्फाच्छादीत शिखरं, खळाळते जलप्रवाह, नद्या, सदाहरीत जंगलाने परीपुर्ण असून पर्यटकाना सदोदीत साद घालत आहे. इथली गावं देश विदेशातील पर्यटकांच आकर्षण ठरू शकतील एवढी देखणी आहेत आणि त्यानी आपली पारंपारीक नृत्य आणि कलांची जपणूकही केली आहे. पर्वतारोहण, राफ्टींग, जंगल सफारी आणि हत्तीवरून फेरफटका मारणं  अशा पर्यटनाच्या अनेक संधी असूनही त्या दृष्टीने हा भाग अजून दुर्लक्षीत राहीला आहे. परशुरामकुंड हे अरुणाचल मधील तिर्थस्थळ,  भालुकपॉंग, दिरांग, बोमदीला, से ला पास,  ही चिन-भारत युद्ध भूमी,   तळ्याचं तवांग या सर्वांचा इतिहास-भूगोलात असलेला उल्लेख एवढाच आपला असलेला संबंध असं न राहाता हिमालयाच्या कुशीत वसलेला अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सह्याद्रीचा भाग असलेला कोकण प्रांत यांचं नातं परशुरामकुंड तसंच पर्यटनाच्या निमित्ताने घट्ट झालं तर विविधतेत असलेली एकात्मता या म्हणण्यालाही काही अर्थ प्राप्त होईल, नाही का?  




Friday, January 23, 2015

चोकलांगन – एक अस्पर्श गाव


तिथे जायला गाडी रस्ता आहे पण तो नावालाच. पस्तीस किलोमीटर गाडीरस्ता पार करायला तीन-साडेतीन तास लागतात.  जवळच्या नोकलॅक या शहरवजा खेड्याला जोडणारा हा रस्ता तयार झाला तोच मुळी 2010 साली. अगोदर हाच पल्ला पार करायला नवू दहा तास लागायचे. हिमालयाच्या कुशीत वसलेलं आणि ब्रम्हदेशाला (म्यानमार) लागून असलेलं हे गाव म्हणजे चोकलांगन. एका अर्थाने बाहेरच्या जगाचा वाराही न लागलेलं. आपलं आपल्यातच गुंतलेलं आणि गुंफलेलं एक स्वयंपुर्ण खेडं.
ब्रम्हदेशाच्या सीमेला लागून असलेल्या या खेड्यातील लोक आपल्या आपतेष्टांना भेटायला जातात ते डोंगरा पलिकडल्या गावात ब्रम्हदेशात. ब्रिटीशांनी भारत सोडताना नकाशावर मारलेल्या रेषांनी या गावकर्‍यांमध्ये अंतर पाडलं नाही. नागालँड राज्यातला तुएनसंग हा सिमावर्ती जिल्हा हिमालयाच्या दर्‍याखोर्‍यांचा बनलेला आहे, याच जिल्ह्यात हे गाव आहे. चोकलांगनसारख्या गावातील डोंगर उतारावर वस्ती करून असलेले गावकरी निसर्गाचा मान राखून, त्याला न दुखावता आपलं जीवनक्रमण करीत आहेत. आधुनिक शिक्षण आणि आरोग्य सेवेचा मागमूसही नसलेल्या या ठिकाणी भारत आणि इंडीया या मधली दरी प्रकर्षाने जाणवत राहाते. आज या एकविसाव्या शतकात जग वाटचाल करीत असताना एकोणीसाव्या शतकातल्या राहाणीमानाशी साधर्म्य असलेलं हे गाव अजून आपल्याला किती भारत निर्माण करायचं राहून गेलं आहे याचा दाखला देतं. मोबाईल तर दूरची गोष्ट पण इथले विजेचे खांबही दिवसा उजेडीच प्रकाश बघतात आणि पुर्वांचलात लवकर होणार्‍य़ा सुर्यास्ताबरोबरच काळोखात गुडूप होतात. 2010 साली तयार करण्यात आलेला रस्ता आता नावालाच शिल्लक आहे. आपला शेजारी देश चिन भारताच्या सिमेलगत जगातले सर्वोत्तम रस्ते निर्माण करीत आहे आणि आपण तयार केलेले रस्ते दुसर्‍याच दिवशी फक्त कागदावरची रेष असतात आणि प्रत्यक्षात कालचा दिवस बरा होता म्हणण्याची पाळी स्थानिक जनतेवर येते.

तीनकशे घरटी असलेल्या चोकलांगन गावात 2640 गावकरी वसती करून आहेत असं तिथली व्यवस्ता सांगते. या एवढ्या लोकवस्तीला भारतात सर्वसाधारण गावात असलेली कुठलीच सेवा-सुविधा किंवा सोय सवलत आज तागायत मिळालेली नाही. सरकार दप्तरी या गावाला  1986 साली विज पुरवठा केल्याचा उल्लेख आढळला तरी 2002 साली पुन्हा एकदा हे गाव विजेच्या तारांनी जेडलं गेलं पण त्या तारांमधून अभावानेच विज प्रवाह खेळत असतो. हे आपल्यां कडून असं असलं तरी ब्रम्हदेशातल्या शेजारी तैगन गावामधून जीवाभावाचा अनोखा प्रवाह या गावापर्यंत सतत वहात असतो. खैमुनगन या एकाच जमातीतले हे लोक चोकलांगन आणि तैगन गावात वसती करून पिढ्यानपिढ्या रहात आहेत. दोन वेगवेगळ्या देशात राहूनही या लोकांमधला बंधूभाव तसूभरही कमी झालेला नाही.

एवढ्या समस्या असल्या तरी इथले लोक खुपच समाधानी आहेत. या गावात गेल्यास अगदी प्रत्येक घर अभ्यागताचं स्वागत करायला उत्सुक असतं. बांबुच्या झोपडीवजा घराशेजारी खेळ खेळणारी लहान मुलं दगड, बांबू, लाकूड अशाच गोष्टी हातात घेवून खेळत असतात. शाळेत शिकायच्या या वयात मात्र त्याना शिकायला शाळाच नाही. पण हे पट्ठे बांबू हातात धरायला शिकल्यानंतर त्याच बांबूपासून तर्‍हतर्‍हेच्या वस्तू बनवायला केव्हा शिकतात ते त्यांचं त्यानाच कळत नाही. इथला प्रत्येकजण परंपरागत बांबूकामात पारंगत आहे. वर्षभरात अल्पकाळ केली जाणारी डोंगर उतारावरची शेती सोडल्यास उरलेल्या वेळी बांबूकामात गुंतलेले इथले हात वयाच्या ऎशीव्या वर्षीही थकत नाहीत.

चोकलांगन हे खेडं जरी आधुनीक जगापासून आणि सोयी सुविधांपासून कोसो दूर असलं तरी याच आधुनीक जगाच्या शोषणा पासून इथला निसर्ग वाचला आहे. म्हणूनच इथली निसर्ग संपदा पाहाताना आपल्याला माणसाने अनिर्बंध वापर करायच्या आधीचं जग पाहिल्याच सुख नक्कीच मिळतं. म्हणूनच हे खर्‍य़ा अर्थाने न बिघडवलेलं जग पहाण्यासारखं आहे. या गावाकडे घेवून जाणारा रस्ता भले ओबडधोबड आहे पण तो ओलांडून गेल्यावर हिरव्यारंगात न्हालेल्या अनंत छटा, निळाईत आणि धुक्याच्या दुलईत धुसर होत जाणारे डोंगर कडे, झुळझुळत जाणारे झरे, बांबूची बेटं असं दिसणारं तिथलं दृष्य आपलं मन मोहून टाकेल यात शंकाच नाही.


या चोकलांगनबद्दल ऎकलं आणि मला माझ्या लहाणपणची कोचरा या गावातून परुळ्याला जाणारी डोंगरातली वाट आठवली. झाड-झाडोरा, तुफान वारा, इकडून तिकडे सतत हालचाल करणारे पक्षी, कधी चुकून दिसणारे पण मनाचा थरकाप उडवणारे बिबळा, रान डुक्कर किंवा रानरेड्यासारखे  हिंस्र प्राणी. दूरवर समुद्रात पसरलेला सिधुदुर्ग किल्ला. वर निळं आकाश आणि पायाखाली कधीही चुकूशील म्हणणारी पाऊलवाट. एक डोंगर चढावा आणि दुसर्‍या बाजूला उतरावं. सहा ऋतू आणि त्रिकाळ वेगवेगळ्या रुपात दर्शन देणारा निसर्ग. आधुनिकतेचं वारं नसलं तरी सतत कात टकत जाणारा हा सगळा परिसर मनाला मोहवून टाकत असे.  

Related Posts Plugin for WordPress, Blogger...