Monday, January 19, 2015

हॉर्नबिल फेस्टिव्हल नागालॅण्ड


पूर्वांचलातील नागालॅण्ड हे राज्य आता पर्यटकांच्या नकाशावर येत आहे. आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांप्रमाणे नागालॅण्ड हे आणखी एक राज्य विकासाच्या रार्‍याला ओ देत प्रगतीकडे वाटचाल करायला सिद्ध झालं असून दरवर्षी मोठ्याप्रमाणात साजरा होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हे त्याचं द्योतक आहे.           

अखंड भारताचा अविभाज्य भाग असलेले उत्तर पूर्वेकडील नागालॅण्ड हे राज्य, उत्तर पूर्वेच्या इतर राज्यांप्रमाणेच सगळय़ाच बाबतीत उपेक्षित राहिलेले आहे. उत्तर पूर्वेच्या या राज्यांपैकी नागालॅण्ड हे भारताच्या स्वातंत्र्यापासूनच स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीमुळे वादग्रस्त आणि तणावग्रस्त होते. परंतु दहा-बारा वर्षांपूर्वी झालेल्या वाटाघाटीनंतर या राज्यामधील परिस्थितीत प्रचंड सुधारणा झाली आहे. परिस्थिती पूर्णपणे निवळली आहे आणि पर्यटनासाठी पोषक होऊ लागली आहे. पर्यटनच या राज्याला समृद्ध करू शकेल हा विचार घेऊन दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पर्यटन मंत्रालयाने विकासाला चालना मिळावी म्हणून 'हॉर्नबिल फेस्टिव्हल' सुरू केला. पहिल्या सहा-सात वर्षांत या फेस्टिव्हलला विशेष यश मिळाले नाही तरीही हा फेस्टिव्हल सुरू ठेवण्यात आला आणि आता गेल्या तीन वर्षांत याला पर्यटकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळू लागला आहे.

नागालॅण्ड हे राज्य १६ विविध आदिवासी जमातींनी बनलेले असून त्यानुसार या राज्याच्या विविध भागांचे विभाजन झालेले आहे. या सर्व जमाती आपल्या भूभागाच्याच रक्षणांसाठी प्रचंड रक्तपात करीत. मुळात या जमाती शूर योद्धे म्हणून प्रसिद्ध होत्या. अतिशय वेगळी आदिवासी संस्कृती असलेल्या या जमातींची प्रत्येकाची वेगळी सांस्कृतिक परंपरा आहे आणि आजच्या आधुनिक जगातदेखील ती संस्कृती यांनी टिकवून ठेवली आहे. प्रत्येक जमातींचा पेहराव, दागिना, घरांची पद्धत, डोक्यावर परिधान करण्याची पद्धत, चालीरीती आणि शस्त्र अशा नाना भिन्न वेगवेगळय़ा गोष्टींमुळे हे राज्य सांस्कृतिकदृष्टय़ा आजही प्रचंड श्रीमंत आहे. पर्यटन विभागाने हीच श्रीमंती सर्वसामान्यांसमोर आणण्यासाठी 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'ची सुरुवात केली.

या फेस्टिव्हलमध्ये किसामा नावाच्या एका गावाबाहेरील मोकळय़ा परिसरात या सर्व सोळा जमातींच्या प्रतिनिधींना एक जागा दिली जाते. या जागेमध्ये ही मंडळी आपापल्या पारंपरिक पद्धतीने घरांची बांधणी करतात. तिथे काही कुटुंबे त्यांच्या पूर्ण पारंपरिक वेशभूषेसह घरातील सर्व पारंपरिक वस्तूंसह फेस्टिव्हलच्या काळात पाहावयास मिळतात. त्यांच्याशी संवाद साधता येतो. त्यामुळेच आपणास केवळ काही एकरांच्या जागेत संपूर्ण नागालॅण्डचा अनुभव घेता येतो. नागालॅण्डची भौगोलिक रचना पाहता या सर्व भागांना आपण वेगवेगळी भेट दय़ायचे ठरवले तर किमान एक महिना लागतो.

या फेस्टिव्हलचे आयोजन दरवर्षी १ डिसेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीमध्ये केले जाते. १ डिसेंबर हा नागालॅण्ड या राज्याचा स्थापना दिवस. त्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून हे आयोजन केले जाते. १ डिसेंबरला राज्याचे मुख्यमंत्री, पर्यटनमंत्री, इतर निमंत्रित पाहुणे आणि पर्यटकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने उद्घाटन करण्यात येते आणि सुरू होतो आठवडय़ाभरासाठी जल्लोष. प्रत्येक जमातीच्या घरासमोर मोकळी जागा असते त्या जागेमध्ये ही मंडळी आपापली पारंपरिक नृत्ये साजरी करीत असतात. काही बायका-मुले बांधलेल्या घरांमध्ये काम करीत असतात. थोडा वेळ विश्रांती घेऊन हे असेच दिवसभर सुरू असते. सर्व घर जवळजवळ असल्यामुळे एका घरातून दुसऱ्या घरात शिरताना जणू काही एका संस्कृतीमध्ये आपण जात आहोत असे वाटते.

प्रत्येक जण आपापली वाद्य्ो जोरजोरात वाजवत असतो. याची सर्वच नृत्ये समूह नृत्ये असतात. नाचताना एक विशिष्ट हेल काढून आवाज काढला जातो. त्यामुळे वातावरणात एक प्रकारचा उत्साह आणि जोश असतो. हे सर्व लोक योद्धे या श्रेणीत मोडत, त्यामुळे शिकारी हा त्यांचा शौर्याचा एक भाग असायचा. त्यामुळेच यांनी शिकारीत मारलेल्या प्राण्यांच्या हाडापासून, चामडय़ापासून बनविलेल्या अनेक वस्तू आपणास पाहायला मिळतात.

आलेल्या सर्व पर्यटकांना फेस्टिव्हलच्या पहिल्याच दिवशी प्रत्येकाच्याच घरासमोरील नृत्याखेरीज इतर नृत्याचा एकत्र आनंद घेता यावा म्हणून याच भागात असलेल्या एका मोकळय़ा मदानात सर्व जमातींच्या एकत्रित नृत्याचे आयोजन केले जाते. त्याचबरोबर या जमातीच्या मनोरंजनासाठी थायलंड, म्यानमार अशा देशांमधून आलेल्या कलाकारांचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले जातात. याच भागात पर्यटकांसाठी नागालॅण्ड राज्याची प्रातिनिधिक कलात्मक वस्तूंची बाजारपेठ असते. वेगवेगळय़ा प्रकारचे खादय़पदार्थाचे स्टॉल असतात. एकंदरच वातावरण उत्सवमय असते.

पर्यटकांसाठी पहिलाच दिवस अतिशय महत्त्वाचा असतो. या दिवशी जवळपास सर्व गोष्टी आपल्याला जवळून पाहता येतात. त्यांचा पर्यटक आयुष्यभरासाठीचा अनुभव पाठीशी बांधून ठेवू शकतो. त्यानंतरच्या पाच दिवसांमध्ये सकाळी दहा ते बारा आणि दुपारी दोन ते चार या वेळांमध्ये पहिल्या दिवशी उपस्थित राहू न शकलेल्या लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते.

नागालॅण्ड हे राज्य पर्यटनास प्रतिकूल आहे, अशा प्रकारचा समज रूढ झालेला होता. त्यामुळे या भागात पर्यटन अतिशय तुरळक होते. या फेस्टिव्हलच्या निमित्ताने या भागात पर्यटकांची गर्दी दिसू लागली आहे. सर्वात महत्त्वाचे, पर्यटकांच्या सुरक्षेविषयी सांगावेसे वाटते की, हा भाग अतिशय सुरक्षित आहे. या राज्यातील प्रत्येक गावाबाहेरच्या वेशीवर एक मोठे प्रवेशद्वार असते आणि त्यावर 'आम्ही आपले स्वागत करीत आहोत,' असा मजकूर गावाच्या नावासह लिहिलेला असतो. माझ्या आजवरच्या पर्यटनात कुठल्याही राज्यामध्ये अशा प्रकारचे स्वागत कोणीही केलेले दिसले नाही. एकंदरच पहाडी लोकांप्रमाणेच हे नागा लोक खूप प्रेमळ आणि दिलदार आहेत. त्यामुळे या भागात पर्यटनासाठी लोकांनी जरूर जावे आणि त्याच्या आदरातिथ्यांचा लाभ घ्यावा.

नागालॅण्ड, आसाम आणि त्रिपूराचे राज्यपाल ना. पद्मनाभ आचार्य
 आणि टीम ईशान्य वार्ता
 
पर्यटनाच्या माध्यमातूनच आपण आपल्या देशातील निसर्ग, सौंदर्य संस्कृती, परंपरा, ऐतिहासिक वास्तू अनेक वैविध्यपूर्ण गोष्टी पाहू शकतो. 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'सारख्या उत्सवामुळे तर एकाच ठिकाणी आपणास संपूर्ण राज्याची ओळख होऊ शकते आणि नागालॅण्डसारख्या हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या या राज्याची एक वेगळी आठवण मनावर कायमची कोरली जाते.


नागालॅण्डचे नवनियुक्त राज्यपाल ना. पद्मनाभ आचार्य यांची अलिकडेच मुंबईत भेट घेतली तेव्हा त्यांनी हॉर्नबिल फेस्टिव्हलच्या माध्यमातून ते राज्य देशातील पर्यटकांना आकर्षित करू इच्छित आहे असं सांगितलं. तिथल्या जन-जातींच्या भाषेतले काही शब्द जरी आपण अवगत केले आणि त्यांच्याशी वार्तालाप केला तरी तिथलं समाजमन आपल्याशी जोडलं जाईल. या वर्षी १ ते १४ डिसेंबर २०१४  या कालावधीत साजर्‍या होणार्‍या हॉर्नबिल फेस्टिव्हलसाठी महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या संखेने कोहीमा इथे यावं असा मनोदय राज्यपाल महोदयानी व्यक्त केला. 

चिनी फटाके नकोच नको



दिवाळी तोंडावर आली असताना फटाक्याच्या बाजारात गर्दी उसळेल. सगळीकडे प्रकाशाची उजळण आणि उधळण करताना करोडो रुपयांचे फटाकेही फोडले जातील. पण हे फटाके आता चीनी बनावटीचेच असतात आणि स्वस्त म्हणून त्याला मागणीही असते. पण आता आपल्याला भारतीय म्हणून विचार करायची वेळ येवून ठेपलेली आहे. चीन हा आता भारताचा सगळ्याच क्षेत्रातला प्रतीस्पर्धी आहे आणि सीमावर्ती भागात चीनच्या हालचाली या सतत त्रासदायक होवून बसल्या आहेत. लडाखसारखा प्रांत असो की अरूणाचल प्रदेश मधले रस्ते बांधकाम, चीन सदोदीत भारताची अडवणूक करीत आला आहे.

अरूणाचल प्रदेशच्या सिमेवरच्या भागात चीनच्या बाजूने प्रशस्त सहा पदरी रस्ते, विमानतळ असं बांधकाम झालं असताना भारताने मात्र आपल्या सीमेत रस्त्यांचं बांधकाम करूच नये असंच चीनला वाटत आलं आहे. ही दादागिरी भारत सरकार आपल्या पातळीवर मोडून काढेलच पण एक भारतीय नागरीक म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे. आजच्या जगात व्यापार हे सुद्धा एक अस्त्र आहे. आणि ते सगळ्यानाच पुरून उरतं. आज भारताच्या सगळ्या बाजारपेठा चीनी मालाने तुडुंब भरल्या आहेत. कपडे, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनीक उपकरणं इतकचं काय गणपतीच्या मुर्ती, आकाश कंदील, विजेचे दिवे, फळ फळावळ हे सगळंच चीनी होत चाललय. दिवाळीचा चीनी फराळ आला तर नवल वाटायला नको.  
 
सीमेवरच्या शत्रूला परत जा म्हणून सांगताना आता सैनिकांबरोबरच नागरीकही आपली भुमिका बजावू शकतात. चीनी मालाला नकार देवून आपण ती बजावली पाहीजे. फटाक्यांसारख्या आवाज आणि हवेचं  प्रदुषण करणार्‍य़ा वस्तू तर कटाक्षाने टाळल्या पाहिजेत.  चिनी फटाके तर नकोच नको.     


 नरेंद्र प्रभू

विलेपारले, मुंबई. 
Related Posts Plugin for WordPress, Blogger...